घणसोलीच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: September 3, 2015 03:03 IST2015-09-03T03:03:01+5:302015-09-03T03:03:01+5:30
घणसोली येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. सचिन झा (२०) असे त्याचे नाव आहे. नेमलेला सुरक्षारक्षक तलावाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने काही जण तलावात

घणसोलीच्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
नवी मुंबई : घणसोली येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. सचिन झा (२०) असे त्याचे नाव आहे. नेमलेला सुरक्षारक्षक तलावाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने काही जण तलावात पोहत असताना ही दुर्घटना घडली. यामुळे तलावाच्या ठिकाणच्या सुरक्षारक्षकांना वेगळ्या कामात जुंपणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
घणसोली गावातील आनंदनगर येथे राहणाऱ्या सचिन झा याचा गुणाली तलावात बुडून मृत्यू झाला आहे. मित्रांसोबत तो तलावामध्ये पोहण्यासाठी उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. शहरातील तलावांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे गत पंचवार्षिक कालखंडात लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्य व्यक्त करत तलावांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी केली होती. याबाबत सतत स्थायी समिती व महासभेत चर्चाही घडल्या होत्या. त्यानंतर तलावांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. परंतु त्यातही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. काही तलावांच्या ठिकाणी तीनपेक्षा जास्त, तर काही ठिकाणी अवघा एकच सुरक्षारक्षक कार्यरत आहे. तलावात कोणी पोहण्यासाठी उतरू नये, कपडे धुऊ नये किंवा घाण करू नये यासाठी हे सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. तलावांच्या ठिकाणी नेमलेल्या या सुरक्षारक्षकांच्या भीतीमुळे त्या ठिकाणचे अनेक गैरप्रकारही टळले आहेत. परंतु काही ठिकाणी या सुरक्षारक्षकांना अधिकारी वेगळ्या कामात गुंतवत असल्याचेही दिसून येत आहे. विभाग कार्यालयातील अथवा प्रभागातील छोट्या - मोठ्या कामांची जबाबदारीही या तलावाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांवर ढकलली जात आहे. (प्रतिनिधी)