कळंबोलीत रस्त्यांचे झाले डम्पिंग
By Admin | Updated: April 20, 2016 02:38 IST2016-04-20T02:38:52+5:302016-04-20T02:38:52+5:30
शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कळंबोलीत रस्त्यांचे झाले डम्पिंग
कळंबोली : शहरात दररोज हजारो टन कचरा तयार होतो. मात्र तो नियमित उचलला जात नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे पादचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. शिवाय वसाहतीतही स्वच्छतेचा बोजवारा उडत आहे. सिडकोकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने अनेक सेक्टरमधील रस्त्यांना डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
कचरा गोळा करणाऱ्या गाड्या नियमित येत नसल्याने आणि सर्व भागात गाड्या जात नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. कळंबोलीतील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या बहुतांश कचराकुंड्या नेहमीच ओसंडून भरलेल्या दिसतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, पादचाऱ्यांना नाक मुठीत घेऊन जावे लागते. अंतर्गत रस्त्यावर प्रत्येक सोसायटीसमोर बिन्स ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये कचरा टाकला जातो. मात्र सिडकोकडून तो दोन ते तीन दिवस उचलला जात नाही. मोकाट गुरांकडून कचरा सर्वत्र पसरवला जात असल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सेक्टर १४ मध्ये ज्ञानमंदिर शाळेच्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा कचरा उचलला जात नाही. त्यामुळे रस्त्याला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्ञानदीप शाळेच्या पाठीमागे असलेल्या सोसायट्यांसमोर तर कचऱ्याचा ढीग लागला आहे. अनेक मोकळ्या भूखंडावर हॉटेल चालकांकडून कचरा टाकला जातो. ठेकेदाराकडे पुरेशा गाड्या नसल्याचे सेक्टर १४, १५ येथील कचरा नियमीच उचलला जात नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, मलेरिया आणि डेग्यूचे रुग्ण वाढत आहेत. कचरा उचलण्याचा ठेका असलेल्या बीवीजी कंपनीच्या निष्क्रियतेमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. सिडकोकडूनही संबंधितांवर कडक कारवाई होत नसल्याने आरोग्य धोक्यात आहे. याप्रकरणी सिडकोने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)