दहीहंडी पुन्हा वादाच्या भोव-यात अडकणार
By Admin | Updated: July 31, 2014 01:38 IST2014-07-31T01:38:23+5:302014-07-31T01:38:23+5:30
सुनावणी १८ आॅगस्टपूर्वी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे. दहीहंडी उत्सवाबाबत नियमावली असावी, या आशयाचा अर्ज शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे केला आहे

दहीहंडी पुन्हा वादाच्या भोव-यात अडकणार
स्नेहा मोरे, मुंबई
बालगोविंदांसंदर्भात बालहक्क आयोग आपल्या निर्णयावर ठाम असताना दुसरीकडे दहीहंडी समन्वय समितीनेही बालगोविंदांना खेळवणारच, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात समन्वय समिती राज्य शासनाच्या मध्यस्थीची वाट पाहत असताना दुसरीकडे साताऱ्याचे रहिवासी चंद्रकांत शिंदे यांनी राज्य मानवी हक्क आयोगाला साकडे घातले आहेत. याबाबतची सुनावणी १८ आॅगस्टपूर्वी घेण्यात यावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली आहे.
दहीहंडी उत्सवाबाबत नियमावली असावी, या आशयाचा अर्ज शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे केला आहे. दहीहंडी उत्सवात सहा थरांनाच मान्यता द्यावी़ त्यापुढे थर रचण्यास बंदी घालावी. तसेच या उत्सवाच्या बाजारीकरणावर निर्बंध घालावे अशा मागण्या आयोगाकडे केल्या .
शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवात २४६ गोविंदा जखमी झाले, तर ६६ गोविंदांची प्रकृती चिंताजनक होती. परंतु त्यांच्या परिस्थितीचा आढावा पुढील काळात घेतला जातो का, त्यांच्या भविष्याची देखभाल कोण करते, याच्या स्पष्टीकरणाची मागणीही त्यांनी केली आहे. याविषयीचा पहिला अर्ज त्यांनी २८ जानेवारी, २०१४ रोजी केला होता. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा शिंदे यांनी मानवी हक्क आयोगाकडे तात्काळ अर्ज करीत १८ आॅगस्ट रोजी दहीहंडी उत्सवापूर्वी सुनावणी व्हावी, अशीही मागणी केली आहे. या उत्सवाला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता द्यावी, या भूमिकेवर शिंदे यांनी प्रथम या खेळाचा सर्व बाजूंनी विचार करून त्यावर अभ्यास करून क्रीडा प्रकाराच्या मान्यतेचा विचार व्हावा, असेही सुचविले आहे.(प्रतिनिधी)