- अनंत पाटील, वैभव गायकर नवी मुंबई, पनवेल : कोरोनाचा सर्वाधिक फटका नाकाकामगारांना बसू लागला आहे. पनवेलसह नवी मुंबईमधील प्रमुख नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावली आहे. भीतीमुळे अनेकांनी कामावर येणेच थांबविले असून, जे नाक्यावर येतात त्यांच्या हातालाही रोजगार मिळेनासा झाला आहे. ‘आमच्या हातावर सॅनिटायझर नको, काम हवे, तोंडाला मास्क नको, पोटभर अन्न हवे,’ अशा प्रतिक्रिया कामगार व्यक्त करत आहेत.नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. काही वेळेला कामगारांची संख्या वाढत असते. कोरोनाची साथ पसरू लागल्यापासून बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. नागरिकांकडून सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे, यामुळे घरांची दुरुस्ती, रंगकाम व इतर कामे थांबविण्यात आली आहेत. मोठ्या बांधकामाच्या ठिकाणचीही अनेक कामे थांबविण्यात आली आहेत, यामुळे पहाटे ७ पासून दुपारी २ वाजेपर्यंत नाक्यावर थांबले तरी कामच मिळत नाही. अनेकांना दिवसभर काम केले, तरच घरखर्च चालविता येतो. काही कामगार पुलाखाली व झोपडपट्टीमध्ये राहतात. कामच नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम मिळत नसल्यामुळे नाक्यावर येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. प्रमुख नाक्यावर दररोज एक हजार ते १५०० कामगार उभे असायचे, आता २० ते २५ कामगार काम मिळेल या आशेने बसतात. मात्र, काम न मिळाल्याने निराश होऊन त्यांना घरचा रस्ता पकडून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची खंत घणसोली येथील नाकाकामगार हरिभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली.कोरोनामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदीत आल्यामुळे आम्हाला कोणी काम देत नाही. सरकारने या विषाणूची लागण होऊ नये म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे, त्याचे स्वागत करतो. मात्र, हातावर पोट असलेल्या कामगारांनी जायचे कुठे? अशी प्रतिक्रि या जनार्दन शिंदे या नाकाकामगाराने दिली.
Coronavirus : नाकाकामगारांवर आली उपासमारीची वेळ, पनवेलसह नवी मुंबईतील नाके ओस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:28 IST