येत्या निवडणुकीत महाराष्ट्रावर भगवा फडकणार - देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 03:20 IST2018-03-31T03:20:02+5:302018-03-31T03:20:02+5:30
शिवसेनेचा दणका अजूनही संपलेला नाही. मागून मिळणार नाही ते हिसकासून घेण्याची ताकद आपल्यात आहे. मध्यंतरी या भागातील एका कारखानदाराला

येत्या निवडणुकीत महाराष्ट्रावर भगवा फडकणार - देसाई
कर्जत : शिवसेनेचा दणका अजूनही संपलेला नाही. मागून मिळणार नाही ते हिसकासून घेण्याची ताकद आपल्यात आहे. मध्यंतरी या भागातील एका कारखानदाराला धडा शिकवला. आमचा हक्क डावलाल तर याद राखा. भूमिपुत्रांना न्याय देणार नाहीत त्यांची गय केली जाणार नाही. नागरिकांच्या विकासासाठी या वेळी या मतदारसंघाचा आमदार शिवसेनेचा असला पाहिजे, अशी खूणगाठ मनाशी बांधा. येत्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रावर भगवा फडकणार हे निश्चित, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
शेळके बंधू सभागृहामध्ये कर्जत तालुका शिवसेनेच्या निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून निर्धार मेळाव्याचे उद्घाटन केले. संभाजी जगताप आणि महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. खासदार श्रीरंग बारणे, महिला संपर्कप्रमुख किशोरी पेडणेकर, संपर्कप्रमुख संजय मोरे, सल्लागार बबन पाटील, हनुमंत पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, विजय पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांनी प्रास्ताविकात, गेल्या दहा वर्षांत वाडी-वस्तीवर रस्ते केले नाहीत. परिसराच्या विकासासाठी आपापसातील मतभेद विसरून कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.
किशोरी पेडणेकर यांनी, निवडणुकीच्या आधी आपल्यातील काही मासे इतर पक्षांच्या गळाला लागतात. मात्र, त्याची आधी चाहूल लागताच थेट संपर्क करण्याच्या सूचना पेडणेकर यांनी दिल्या.
खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या मनोगतात, आगामी लोकसभा व विधानसभा स्वबळावर लढविण्याचा निर्धार पक्षप्रमुखांनी दिला आहे. त्यासाठी आपण मागचे सारे विसरून कामाला लागा, असा सल्ला दिला. कर्जत अणि शिवसेनेचे नाते घट्ट आहे. शिवसेनाप्रमुखांचे या भूमीमध्ये वास्तव्य होते. ज्या उमेदवाराला निवडणुकीचे तिकीट मिळेल त्याला निवडून आणण्याचा चंग बांधा. निवडणुकीआधी आपण एकत्र असतो आणि ऐन निवडणुकीत भांडतो या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीवाले साडेचार वर्षे भांडतात आणि निवडणुकीत एकत्र येऊन निवडणूक जिंकतात. बंडखोरीचे ग्रहण काढून टाका, असा सल्ला शिंदे यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.