पालिकेसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान

By Admin | Updated: November 4, 2015 01:20 IST2015-11-04T01:20:23+5:302015-11-04T01:20:23+5:30

महापालिका आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे प्रशासनाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. उपकर, पाणी व मालमत्ता कराची तब्बल ४४८ कोटी ७५ लाख रुपयांची

Challenge of outstanding recovery to the corporation | पालिकेसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान

पालिकेसमोर थकबाकी वसुलीचे आव्हान

- नामदेव मोरे,  नवी मुंबई
महापालिका आर्थिक संकटात सापडली असल्यामुळे प्रशासनाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. उपकर, पाणी व मालमत्ता कराची तब्बल ४४८ कोटी ७५ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. उद्योजक व व्यापाऱ्यांकडे सर्वाधिक २८४ कोटी व मालमत्ता कराची जवळपास १६१ कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.
पालिका प्रशासनाने थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून, मागील दोन महिन्यांत ४२७ जणांची बँक खातीही गोठविण्यात आली आहेत. त्यांच्याकडून २ कोटी ८५ लाख रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे. याशिवाय आॅनलाइन शॉपिंग करणाऱ्या काही कंपन्यांकडूनही यापूर्वी वसुली करण्यात आली होती.

शासनाने एलबीटी रद्द केल्याचा सर्वाधिक फटका नवी मुंबई महानगरपालिकेला बसला आहे. उत्पन्नाचा प्रमुख स्रोतच बंद झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होऊ लागला आहे. आर्थिक स्थितीवर चर्चा करण्यासाठी आॅक्टोबरमध्ये विशेष महासभा घेण्यात आली होती. यानंतर महापालिकेने अनावश्यक खर्च कमी करण्यास सुरुवात केली असून, उत्पन्न वाढविण्याबरोबर थकबाकी वसुलीवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

एलबीटी विभागाचा पाठपुरावा
एलबीटी विभागाच्या उपायुक्त पदावर उमेश वाघ यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी थकबाकी वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मागील काही महिन्यांत जुन्या थकबाकीदारांकडील जवळपास २५ कोटी रुपये वसूल केले आहेत. दोन महिन्यांत तब्बल ४२७ जणांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.

सिडकोकडे
२३ कोटींची थकबाकी
सिडकोकडे उपकराची २३ कोटी ७८ लाख रुपयेथकबाकी आहे. सदर प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे. सदर रक्कम वसूल करण्यासाठी शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तर देताना दिली आहे.

१शहरातील २७२१ उद्योजकांकडून २८४ कोटी ४२ लाख २१ हजार रुपये व एलबीटीच्या २६३ थकबाकीदारांकडे ३९ लाख १४ हजार १९५ रुपये अशी एकूण २८४ कोटी ४२ लाख २१ हजार रुपये रक्कम येणे बाकी आहे. यामधील अनेक उद्योजक न्यायालयात गेले असून, काही जणांनी अपील केले आहे. त्यांच्याकडील रक्कम ९४ कोटी ८८ लाख रुपये आहे. उर्वरित १८९ कोटी रुपयांची वसुली करण्यासाठी प्रशासनाने सुरुवात केली आहे. मागील दोन महिन्यांमध्ये तब्बल ४२७ जणांची बँक खाती गोठविण्यात आली असून, २ कोटी ८५ लाख ६४ हजार रुपये वसूल केले आहेत. याशिवाय शासनाकडे एलबीटीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रत्येक महिन्याला साडेअकरा कोटी रुपये दिले जात आहेत.


२शहरात मार्च २०१५ अखेर २७,४८२ नागरिकांनी मालमत्ता कर थकविला आहे. त्यांच्याकडे ९२ कोटी ४४ लाख रुपये व व्याज आणि दंडाची ६९ कोटी ७ लाख रुपये अशी एकूण १६१ कोटी रुपये येणे बाकी आहे. मालमत्ता कर विभागाने सर्व थकबाकीदारांना नोटीस पाठविल्या आहेत. त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी तगादा लावला असून, मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे वसुलीमध्ये वाढ होऊ लागली आहे.

३गतवर्षी सप्टेंबर अखेर १६४ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यावर्षी ही रक्कम २३२ कोटी रुपयांवर गेली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी पाणीबिलाची रक्कमही थकविली आहे. २ कोटी ४३ लाख ८ हजार रुपये येणे बाकी असून, पाणीबिल न भरणाऱ्यांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये थकबाकीदारांना अभय दिले जाणार नसून, कारवाईचा कटू अनुभव येण्याअगोदर नागरिकांनी स्वत:हून थकीत रक्कम जमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Challenge of outstanding recovery to the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.