सायबर सिटीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही वॉच
By Admin | Updated: July 21, 2014 01:10 IST2014-07-21T01:10:45+5:302014-07-21T01:10:45+5:30
वाढत्या गुन्हेगारी घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर आपला तिसरा डोळा बसवला आहे

सायबर सिटीच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही वॉच
सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
वाढत्या गुन्हेगारी घटनांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वारांवर आपला तिसरा डोळा बसवला आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये शहराबाहेरील गुन्हेगारांचा हात दिसून आलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत शहराच्या १५ प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
वाढत्या शहरीकरणाबरोबरच नवी मुंबईत गुन्हेगारी घटनांचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामध्ये सोनसाखळी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांची उकल नवी
मुंबई पोलिसांकडून झालेली
असून त्यातील गुन्हेगार हे शहराबाहेरील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हद्दीबाहेर तपासामध्ये नवी मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी दुसऱ्या पोलीस आयुक्तालय हद्दीत जाऊन कारवाई करतानाही तिथल्या विरोधाला पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या प्रवेशद्वारांवरच पोलिसांनी पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी परिमंडळ १ व २ मधील एकूण १५ प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे तेथून रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवणार आहेत. त्याद्वारे वाहनाच्या नंबर प्लेटवरील नंबरही
पोलिसांना कळू शकणार आहे.
त्यामुळे धूम स्टाईलने सोनसाखळी चोरी करुन शहराबाहेर पळ काढणाऱ्या चोरांचा मार्ग पोलिसांना कळणार आहे.
प्रवेशद्वारांसह शहरातील इतरही मुख्य ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांमार्फत बसवले जाणार आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असल्याचे परिमंडळ १ चे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. यापूर्वी महापालिकेने पालिका क्षेत्रात २४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्याद्वारे काही गुन्ह्यांची
उकल करण्यास पोलिसांना मदत झालेली आहे. परंतु शहराच्या प्रवेशद्वारांवर अशा कॅमेऱ्यांची कमतरता जाणवत होती.
त्यामुळे शहराबाहेरील गुन्हेगारांना नवी मुंबईचे प्रवेशद्वार सदैव खुलेच होते. अखेर बाहेरून येणाऱ्या
गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले
आहे. त्यामुळे महापालिकेसह पोलिसांच्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार झाले आहे. त्याद्वारे संपूर्ण शहर हे पोलीस आयुक्तालयाच्या नजरेच्या टप्प्यात येणार असल्याचा विश्वासही उपआयुक्त मेंगडे यांनी व्यक्त केला. कॅमेरे बसवण्यासाठी पोलिसांनी स्थानिक समाजसेवक तसेच उद्योजक यांचे सहकार्य घेतले आहे. (प्रतिनिधी)