वादळात सापडलेल्या नौका दमणमध्ये
By Admin | Updated: September 23, 2015 03:56 IST2015-09-23T03:56:08+5:302015-09-23T03:56:08+5:30
सातपाटीच्या बंदरातून समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या सहा नौका समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळामध्ये सापडल्या. मुसळधार पाऊस, तुफानी वादळी वारे आणि लाटांशी जिवघेणी झुंज

वादळात सापडलेल्या नौका दमणमध्ये
पालघर : सातपाटीच्या बंदरातून समुद्रात मच्छीमारीला गेलेल्या सहा नौका समुद्रात अचानक निर्माण झालेल्या वादळामध्ये सापडल्या. मुसळधार पाऊस, तुफानी वादळी वारे आणि लाटांशी जिवघेणी झुंज घेत ८६ खलाशी व तांडेल भरकटलेल्या अवस्थेत केंद्रशासीत दमणच्या समुद्रकिनाऱ्यावर सुखरूपणे पोहचल्या असल्या तरी दोन नौका खडकावर आदळून त्यांचे मोठे नुकसान झाले.
सातपाटी बंदरातून ४०० ते ४५० लहान मोठ्या नौकाद्वारे मासेमारी केली जाते. परंतु गणपती व गौरीचा सण साजरा करण्यासाठी नौकेमध्ये खलाशी कामगार म्हणून काम करणारे विक्रमगड, जव्हार, डहाणू, तलासरी इ. भागातील बहुतांशी कामगार घरी गेल्याने बहुतांशी मासेमारी व्यवसाय ठप्प पडला होता. १४ सप्टेंबर रोजी सातपाटी मच्छीमार सहकारी संस्थेचे सभासद असलेले छबीलदास गणु मेहेर यांची ‘गौरीपुजन’, दिलखुश तांडेल यांची ‘साईगणेश’, नरेश तांडेल यांची ‘जलसुंदरी’ तर सर्वोदय सहकारी संस्थेच्या महादेव सोमला किणी यांची ‘विश्वकर्मा’, छबिलदास मेहेर यांची ‘आदिमाया’ व धिरज किणी यांची ‘रत्नसागर’ या सहा नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाल्या होत्या. चार दिवस मासेमारी केल्यानंतर १८ सप्टेंबरला रात्रौ १ वा. तुफानी वादळी वारे व मुसळधार पाऊस अचानक सुरू झाल्याने सर्व मच्छीमारांची एकच त्रेधरापीट उडाली. समुद्रात टाकलेली जाळी पटापट नौकामध्ये घेऊन आपण परतीचा प्रवास करावा असे सर्वानुमते ठरले. परंतु वाऱ्याचा मोठा झंझावात सुरू झाल्याने उसळलेल्या तुफानी लाटा चुकविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे ठाकले होते. त्यातच सर्व नौकावरील वायरलेस सेट नेटवर्क बंद पडल्याने या जवळपास असणाऱ्या सहाही नौकांचे संपर्क तुटले होते. सर्वत्र मिट्ट काळोख त्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर त्यामुळे समुद्राच्या प्रवाहाबरोबर या नौका वाट फुटेल त्या दिशेने भरकटत जात होत्या. प्रत्येक नौकेत असणाऱ्या १४ ते १५ खलाशी कामगार देवाचा धावा करीत जीवाची याचना करीत होते. (वार्ताहर)