महापौरांच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल
By Admin | Updated: October 15, 2016 06:57 IST2016-10-15T06:57:12+5:302016-10-15T06:57:12+5:30
महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त करून मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे.

महापौरांच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल
नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त करून मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे. राजकीय व प्रशासकीय कोंडीमुळे एकाकी पडलेल्या महापौरांच्या मदतीला आरपीआय धावून आली आहे. शहराच्या प्रथम नागरिकाच्या सन्मानासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला असून आंबेडकर स्मारकाचे काम रखडले असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये दरी निर्माण झाली आहे. प्रशासन सर्वसाधारण सभेच्या निर्णयांचीही अंमलबजावणी करत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही भेट घेतली नसल्याने व प्रशासन लोकहिताच्या कामाविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे. शहरात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामध्ये महापौर एकटे पडले असल्यामुळे आरपीआयने पत्रकार परिषद घेवून आम्ही महापौरांसोबत असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी आंबेडकरी चळवळीमधून आलेल्या महापौरांचा वारंवार अवमान होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराच्या प्रथम नागरिकाचा सन्मान राखला पाहिजे. महापौरांनी बहिष्कार मागे घेवून पुन्हा मुख्यालयात जावून कामकाजाची धुरा सांभाळावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रशासनाने त्यांची एकाधिकारशाही थांबविली नाही तर आरपीआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोनावणे यांनी ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे, स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यासाठी आग्रह धरला होता. पण अनेक दिवसांपासून स्मारकाचे कामही ठप्प झाले असून तो आंबेडकरी जनतेचाही अवमान असल्याचे स्पष्ट केले.
आरपीआयचे नेते महेश खरे यांनीही आम्ही ठामपणे महापौरांसोबत असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना नगरसेवक संजू वाढे हेही आरपीआयच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे. महापालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रशासनाची मनमानी सुरू आहे. लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. लोकप्रतिनिधींना योग्य मान दिला जात नाही. त्यांच्या सूचनांचा आदर केला जात नसून प्रशासनाच्या मनमानीचे ९ मुद्दे उपस्थित केले. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती सुरू असून लवकरच याविषयी मार्ग निघाला नाही तर आंदोलन करावे लागेल असे स्पष्ट केले. यावेळी यशपाल होवाळ, शीलाताई बुदडे, रमेश गांगुर्डे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.