युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर
By Admin | Updated: January 8, 2015 22:40 IST2015-01-08T22:40:09+5:302015-01-08T22:40:09+5:30
प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत.

युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर
वसई : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर युती व आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाल्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सेना-भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते.
कालांतराने सेना-भाजपाची युती झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या दोघांमध्ये जागांसंदर्भात समझोता होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप सुंदोपसुंदी सुरूच असल्यामुळे हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकमेकांसमोर उमेदवार उभे करतील, असा अंदाज आहे.
पालघर जिल्ह्यातील ३ विधानसभा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीमध्ये सातही तालुक्यांतील गट व गणांच्या जागा लढवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकार स्थापनेकरिता भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारी बविआ जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपाशी समझोता करील, अशी शक्यता नाही. स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी बविआच्या वरिष्ठ नेत्यांचे तेवढे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर समझोता होण्याची शक्यता फार कमी आहे.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाशी दुरावा निर्माण झाल्यामुळे बविआ पुन्हा काँगे्रसच्या वळचणीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डहाणूवगळता अन्य तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ नसल्यामुळे या निवडणुका लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. सेनेने यापूर्वीही पालघर तालुक्यात या निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविल्याने यंदाही ते पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पालघर येथे सेनेची लढत बहुजन विकास आघाडीशीच होण्याची शक्यता आहे. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येथील काँगे्रस विस्कळीत झाली आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रचंड वाद झाले.
एकंदरीत या सर्व घडामोडीवरून काँग्रेस पक्ष एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाईल, अशी शक्यता वाटत नाही. वसई जनआंदोलन समितीचे नेते विवेक पंडित यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्यामुळे हा पक्ष अद्याप
पराभूत मानसिकतेमधून बाहेर आलेला नाही. त्यामुळे त्यांनाही या
निवडणुका लढवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.