पनवेलमध्ये ५० इमारती धोकादायक
By Admin | Updated: September 3, 2015 03:03 IST2015-09-03T03:03:46+5:302015-09-03T03:03:46+5:30
नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.

पनवेलमध्ये ५० इमारती धोकादायक
पनवेल : नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काही ठिकाणी मालक व भाडोत्रींमध्ये वाद आहे. त्यामुळे लोक जीव धोक्यात घालून रहात असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
पनवेलमधील जुन्या वाड्यांची जागा इमारतींनी घेतली असली तर आजही काही जुनी बांधकामे शहरात आहेत. काही इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या असून त्यांची समजूतही घालण्यात आली आहे. मात्र मालक आणि भाडोत्री यांच्यातील वाद या गोष्टीचा अडथळा निर्माण करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मिरची गल्ली येथे मोडकळी आलेली इमारत अचानक कोसळली. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र पुरोहित यांच्या मालकीच्या या इमारतीत भाडोत्री कोणत्याही परिस्थिती घर खाली करायला तयार नाही. अशीच परिस्थिती इतर ठिकाणी सुध्दा असल्याने आजच्या घडीला काही धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या नाहीत.
महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती त्याचबरोबर त्यांच्या मालकांची नावे प्रसिध्द करून जाहीरपणे इमारती खाली करून ते बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जाहिरात फलकावर बॅनर्स लावून नागरिकांना या संदर्भात धोक्याची सूचना दिली. पनवेल बस स्थानकाच्या एका इमारतीचाही त्यामध्ये समावेश होता. पालिकेची नोटीस मिळताच एसटी महामंडळाने दोनही बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी हलविले आणि संबंधित इमारत जमीनदोस्त केली. त्याच यादीत आयटीआयच्या इमारतीचा सुध्दा समावेश होता मात्र ही इमारत जैसे थे आहे. या ठिकाणी विद्यार्थी जीव मुठीत धरून राहत आहेत. (वार्ताहर)