१८७ इमारती धोकादायक
By Admin | Updated: May 29, 2016 03:14 IST2016-05-29T03:14:35+5:302016-05-29T03:14:35+5:30
महापालिकेने शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी ९२ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. यावर्षी हा आकडा १८७ झाला आहे.

१८७ इमारती धोकादायक
- नामदेव मोरे, नवी मुंबई
महापालिकेने शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी ९२ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. यावर्षी हा आकडा १८७ झाला आहे. वाशीमधील सर्वाधिक ८७ सोसायट्यांचा समावेश आहे.
नवी मुंबईमधील सिडकोने बांधलेल्या इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. वाशी, नेरूळ, तुर्भे परिसरामध्ये शेकडो इमारतींचे बांधकाम धोकादायक झाले आहे. या इमारतींमध्ये राहणारे हजारो नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. अनेक इमारतींचे बांधकाम धोकादायक झाले असतानाही राजकीय दबावामुळे त्यांचा समावेश अनेक वर्षांपासून या यादीमध्ये केला जात नव्हता. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लवकर धोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. प्रलंबित प्रकरणेही तत्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले होते. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज तातडीने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी शहरात ९२ इमारती धोकादायक असल्याची यादी जाहीर केली होती. यावर्षी तब्बल १८७ इमारतींचा समावेश आहे. वाशीमध्ये सर्वाधिक ८७ गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश आहे. यामधील एका सोसायटीमध्ये १८ ते ३० इमारती आहेत. काही इमारती यापूर्वीच खाली करण्यात आल्या आहेत. उर्वरित इमारतींमधील नागरिकांना पर्याय नसल्याने जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत.
महापालिका प्रत्येक वर्षी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते. धोकादायक इमारतींचा वापर तत्काळ थांबविण्यात यावा. दुरुस्तीयोग्य असणाऱ्या इमारतींची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, असा इशारा दिला आहे. धोकादायक इमारतींचा वापर सुरू ठेवला व पावसाळ्यात दुर्घटना घडली तर त्याला पालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. धोकादायक इमारती खाली करण्यास सांगताना त्यांनी नक्की जायचे कुठे, याविषयी पालिकेकडे काहीही धोरण नाही. यादीमध्ये एपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केट, मॅफ्को मार्केट, तुर्भेमधील रामतनू माता बाल रुग्णालयाचाही समावेश आहे.
महापालिकेच्या यादीत चुकीची माहिती
महापालिकेने धोकादायक बांधकामांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सर्वाधिक धोकादायक असलेल्या श्रद्धा अपार्टमेंटमधील बिल्डिंग नंबर २२ ते ४४ या २३ इमारतींचाही समावेश आहे. यामधील बिल्डिंग नंबर २२, २३, २४, २६,२८, ३०, ३५ या इमारतींचा वापर यापूर्वीच बंद केला आहे. १७ वर्षांपूर्वी काही इमारती खाली केल्या असताना महापालिकेने या इमारतींचा वापर होत असल्याचे म्हटले आहे. वाशीमधील मेघराज व मेघदूत चित्रपटगृह १ जानेवारी २०१५ ला बंद करण्यात आले आहे. परंतु महापालिकेने अद्याप त्याचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे.
वाशीतील रहिवाशांवर १९ वर्षे अन्याय
शहरातील सर्वाधिक धोकादायक इमारती वाशी परिसरामध्ये आहेत. १९९७ मध्ये मुंबई आयआयटीकडून या परिसरातील इमारतींच्या बांधकामाची पाहणी केली होती. संस्थेने ९ मे रोजी १९९७ ला त्यांचा अहवाल सादर केला आहे. यामध्ये या इमारतींचे बांधकाम धोकादायक असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु महापालिका प्रशासनाने तब्बल १९ वर्षे हा अहवाल दुर्लक्षित ठेवला होता. रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही या इमारती धोकादायक घोषित केल्या जात नव्हत्या. राजकीय दबावामुळेच रहिवाशांच्या जीवाशी खेळ सुरू होता.
वाशीतील रहिवाशांचे थाळीनाद आंदोलन
वाशीमध्ये सर्वाधिक ८७ गृहनिर्माण सोसायट्यांमधील बांधकामे धोकादायक घोषित केली आहेत. यामध्ये बहुतांश सोसायटींमध्ये १५ ते ३५ इमारती आहेत. जवळपास ३०० इमारती या परिसरात आहेत. पुनर्विकासासाठी १६ प्रस्ताव महापालिकेकडे सहा महिन्यांपूर्वीच सादर केले आहेत. राजकीय दबावामुळे वारंवार त्रुटी काढून बांधकाम परवानगी रखडविण्यात आली आहे. त्यामुळे रहिवासी रविवारी वाशीमध्ये थाळीनाद करणार आहेत.