पनवेलमधील १५ गावे, ३४ वाड्या टंचाईग्रस्त
By Admin | Updated: March 16, 2017 03:12 IST2017-03-16T03:12:49+5:302017-03-16T03:12:49+5:30
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती

पनवेलमधील १५ गावे, ३४ वाड्या टंचाईग्रस्त
मयूर तांबडे, पनवेल
पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य टंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे तर३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मार्च महिना उजाडून १५ दिवस उलटले आहेत त्यामुळे उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला आहे. पनवेल तालुक्यातील अनेक गाव-पाडे काही प्रमाणात सद्यस्थितीत पाण्याच्या टंचाईने ग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये १५ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे गाव-वाड्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मार्च महिन्यापासूनच पायपीट करावी लागत आहेत. ३१ मार्चअखेर इतकी बिकट अवस्था असेल, तर त्यापुढील एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत यापेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, अशी भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. टंचाई कृती आराखड्यात संभाव्य टंचाई लक्षात घेऊन मार्च, एप्रिल आणि मे अशा पद्धतीने टंचाईग्रस्त गावांची उपाययोजनांसाठी वर्गवारी करण्यात आली आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ८ गावे आणि १४ वाड्यांचा अशा २२ गाव-वाड्यांचा कृती आराखडा पाठविण्यात आला आहे. या कृती आराखड्यानुसार गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे व एक खासगी विहीर करण्यात येणार आहे. २०१७ च्या उन्हाळ्यात पनवेल तालुक्यातील १५ गावे, ३४ वाड्या असे एकूण ५२ नवीन विंधण विहिरी घेण्यासाठी २६ लाख व पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी एकूण पाच टँकर व खासगी बोअरवेल (वीजपंप) लागणार असून त्यासाठी २३ लाख असा एकूण ४९ लाख इतका अंदाजित खर्च अपेक्षित आहे.
मार्च अखेरपर्यंत तालुक्यातील काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे असे येथील प्रशासनाचे मत आहे. असा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.
पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात शासकीय यंत्रणेकडून पाणी पुरवठा होऊ शकेल, परंतु त्यासाठी लागणारे पाणी आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारे टँकर उपलब्ध होणार आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा पनवेल पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये ८ गावे, त्याखालील १४ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.