सरसंघचालकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा
By Admin | Updated: June 8, 2015 03:14 IST2015-06-08T03:14:09+5:302015-06-08T03:14:09+5:30
अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांना आता २४ तास विशेष समूहाचे सुरक्षा कवच राहणार आहे.
सरसंघचालकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा
नागपूर : अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांना आता २४ तास विशेष समूहाचे सुरक्षा कवच राहणार आहे. ‘झेड प्लस’ दर्जाची मात्र केंद्राच्या अधिकार क्षेत्रातील ही सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलावर (सीआयएसएफ) राहणार आहे.
सरसंघचालक भागवत यांच्यासह नागपुरातील संघ मुख्यालय सुद्धा अनेक अतिरेकी संघटनांच्या हिटलिस्टवर आहे. यापूर्वी संघ मुख्यालयावर प्रचंड क्षमतेची स्फोटके घेऊन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न देखील केला आहे. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय आणि सरसंघचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकावर (एसपीयू) आणि राज्य राखीव दलाच्या (आरपीएफ) जवानांकडे होती.
गुप्तचर यंत्रणांचा इशारा
सूत्रांच्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडून अलीकडे मिळालेल्या संकेतानुसार, भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करून त्यांना व्हीव्हीआयपी सुरक्षा पुरविण्याचा निर्णय सरकारने घेतला.
असे असेल सुरक्षा कवच
भागवत नागपुरात संघ मुख्यालयात असो किंवा महाराष्ट्र अथवा देशभर जिथे कुठे दौऱ्यावर जातील, तेथे त्यांच्या आजूबाजूला सुमारे ६० कमांडोंचा गराडा असेल. २४ तास सरसंघचालकांच्या सुरक्षेत हे कमांडो तैनात असतील. नव्या सुरक्षेंतर्गत त्यांच्या ताफ्यातील वाहनेही बदलण्यात येतील. या विशेष सुरक्षा समूहाकडे एके ४७ / ५६ रायफल्ससारखी अत्याधुनिक हत्यारे तसेच अत्याधुनिक संपर्क यंत्रणा असेल. ऐनवेळी उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना सुरक्षेच्या खातर हे कमांडो जागेवरच कोणताही निर्णय घेऊ शकतात.
पाचपट कडक सुरक्षा
सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या नागपुरातील चार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सध्या झेड प्लस सुरक्षा कवच आहे. स्थानिक एसपीयू मधील १२ सशस्त्र अधिकारी, कर्मचाऱ्यांचे (कमांडो) पथक ही सुरक्षा व्यवस्था सांभाळतात. हे पथक राज्य सरकारच्या अखत्यारातील आहे. त्या तुलनेत तब्बल पाच पट अधिक कमांडो (सुरक्षा व्यवस्था) असणारे आणि केंद्राच्या अख्त्यारातील सुरक्षा कवच बहाल झालेले सरसंघचालक भागवत हे नागपुरातील प्रथम अतिमहत्त्वाची व्यक्ती ठरले आहेत. (प्रतिनिधी)