मोदींनी मदत देऊनही तरुणाचे प्राण गेलेच!
By Admin | Updated: July 5, 2015 04:29 IST2015-07-05T04:29:50+5:302015-07-05T04:29:50+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने

मोदींनी मदत देऊनही तरुणाचे प्राण गेलेच!
वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पाच महिन्यांपूर्वी तत्परतेने आर्थिक मदत देऊनही लखनौच्या सरकारी इस्पितळात अशा शस्त्रक्रियांसाठी मोठी प्रतीक्षायादी असल्याने या तरुणाचा बुधवारी शस्त्रक्रियेअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.
वाराणसीच्या रोहानिया भागात राहणाऱ्या संतोषकुमार या तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केल्यापासून लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये वेळोवेळी डायलिसिस केले जात होते. संतोषकुमारला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी ४.३७ लाख रुपये खर्च सांगितला. एवढे पैसे उभे करणे अशक्य असल्याने रिटा हिने पंतप्रधान मोदींच्या वाराणसी जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख शिवशरण पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्याचा उपयोग झाला व गेल्या फेब्रुवारीत पंतप्रधान कार्यालायने संतोषकुमारवरील शस्त्रक्रियेसाठी २.१७ लाख रुपयांची रक्कम संजय गांधी इस्पितळात जमाही केली. भाजपाचे विधान परिषद सदस्य लक्ष्मण वापपेयी यांनी त्यांच्या आमदार निधीतून बाकीची रक्कम देण्याचे वचन दिले होते.
संजय गांधी इस्पितळात मोठी वेटिंग लिस्ट आहे व तोपर्यंत संतोषकुमारची शस्त्रक्रिया लांबविणे इष्ट नाही हे लक्षात घेऊन, या इस्पितळाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या इस्पितळात करण्याची सूचना, संजय गांधी इस्पितळाचे संचालक प्रा. राकेश कपूर यांनी मध्यंतरी केली होती. यास दुजोरा देताना किंग एडवर्डचे कुलगुरु रविकांत यांनी सांगितले की, कपूर १ जुलै रोजी या संदर्भात माझ्याशी बोलले होते. परंतु मी त्यांना सांगितले की, आम्ही शस्त्रक्रियेसाठी फक्त आॅपरेशन थिएटर उपलब्ध करून देऊ पण पुढील उपचार नेफ्रॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली करणे गरजेचे असल्याने रुग्णाला नंतर संजय गांधीमध्ये हलवावे लागेल. त्यानंतर कपूर यांच्याकडून काही उत्तर आले नाही, असेही रविकांत म्हणाले. (वृत्तसंस्था)
सामान्य माणसाच्या आजारपणाचे गांभीर्य राजकारणी व संजय गांधी इस्पितळाच्या प्रशासनाने लक्षात न घेतल्यानेच माझ्या भावाला प्राण गमवावे लागले. -रिचा, संतोषकुमारची बहीण