West Bengal Election : पुढील वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजप हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणणार आहे. बांग्लादेशात हिंदूंवर होणारे अत्याचारासह निवडणुकीपूर्वी येणाऱ्या रामनवमीमुळे भाजपला बुस्टर डोस मिळण्याची शक्यता आहे. हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी भाजप रामनवमीसह हिंदू सणांचा पुरेपूर वापर करू शकते.
बांग्लादेशमध्ये गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या सत्तापालटानंतर हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या घटनांमुळे आणि आता पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यात रामनवमी हा सण राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्यात ध्रुवीकरण आणि काउंटर ध्रुवीकरणाची शर्यत सुरू असल्याने रामनवमी उत्सवाला वेगळाच रंग प्राप्त झाला आहे.
हिंदू मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्नपुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप हिंदू मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असून, पक्षाने रामनवमी उत्सवाला आपल्या प्रचाराचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि विश्व हिंदू परिषद (VHP) यांसारख्या हिंदू संघटनांनी 6 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आठवडाभर रामनवमी उत्सवासाठी राज्यातील सर्व ब्लॉकमध्ये मिरवणुका काढण्याची तयारी केली आहे. या काळात 3 कोटींहून अधिक लोक जमवण्याचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. या मिरवणुका 'बांग्लादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या घटना' आणि तृणमूल काँग्रेसच्या 'तुष्टीकरणाच्या राजकारणा'विरुद्ध प्रतीकात्मक प्रदर्शन म्हणून काम करतील.
लोकांचे डोळे उघडणणारकेंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे हल्ले, हे सीमेच्या (भारतातील) बाजूच्या लोकांसाठी डोळे उघडणारे आहेत. जर आपण आता त्याचा प्रतिकार केला नाही, तर टीएमसीच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधील हिंदूंचीही अशीच स्थिती होऊ शकते. पश्चिम बंगालमध्येही तृणमूलने पाठिंबा दिलेल्या जिहादींकडून हिंदूंना अशाच प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. यंदाचा रामनवमी उत्सव अशा अत्याचारांना 'उत्तर' ठरेल, असे ते म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेचे राज्य सचिव चंद्र नाथ दास म्हणाले की, महाकुंभमेळ्याला आणि अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या बंगाली भाविकांची विक्रमी संख्या, बांग्लादेशातील अत्याचाराला बळी पडलेल्या आपल्या नातेवाईकांशी अनेक हिंदूंचे भावनिक नाते आण राज्य सरकारच्या तुष्टीकरणाच्या धोरणांविरुद्ध राज्यात वाढत असलेला असंतोष, यामुळे यंदाच्या रामनवमीने लोकांना आपला संताप आणि निषेध व्यक्त करण्याची संधी दिली आहे.
रामनवमीच्या दिवशी राज्यात जातीय संघर्ष वाढणारटीएमसीचे खासदार सौगता रॉय यांनी मतदारांच्या ध्रुवीकरणाचा आरोप करत भाजपवर टीका केली. भाजप पश्चिम बंगालमधील जातीय सलोखा बिघडवण्यासाठी जाणूनबुजून धार्मिक सणांचा वापर केला जातोय. भाजपच्या लोकांना निवडणुकीपूर्वी लोकांमध्ये फूट पाडायची आहे, असा आरोप त्यांनी केला.