काँग्रेसमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी
By Admin | Updated: August 19, 2015 22:27 IST2015-08-19T22:27:35+5:302015-08-19T22:27:35+5:30
शहर कार्यकारणीत तुर्तास नाही बदल : मोहन प्रकाश यांचे संकेत

काँग्रेसमधील इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी
श र कार्यकारणीत तुर्तास नाही बदल : मोहन प्रकाश यांचे संकेत पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहर कार्यकारणीत बदल करण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे इच्छुकांकडून शहराध्यक्षपदासाठी मुंबईला लॉबींग सुरू आहे. मात्र, शहर कार्यकारणीत तुर्तास कोणतेही बदल होणार नसल्याचे संकेत काँग्रेसचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश यांनी बुधवारी दिले. त्यामुळे काँग्रेसमधील इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला. शहरातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. त्यावेळी शहराध्यक्ष ॲड. अभय छाजेड यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी घेवून राजीनामा दिला होता. परंतु, तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी छाजेड यांचा राजीनामा स्वीकारला नाही. मात्र, प्रदेशाध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वी अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शहराध्यक्ष व शहर कार्यकारणीत बदल करण्याची चर्चा सुरू झाली.खुद्द अशोक चव्हाण यांनी एक महिन्यांत बैठक घेवून शहरातील कार्यकारणीत फेरबदल करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या महिन्यांभरात शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी चव्हाण व मोहन प्रकाश यांना समर्थकांसह भेटून लॉबींग सुरू केले होते. शहर काँग्रेसतर्फे आयोजित राजीव गांधी जीवन दर्शन छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मोहन प्रकाश बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी शहराध्यक्षपदासाठी इच्छुक माजी आमदार रमेश बागवे, मोहन जोशी, उपमहापौर आबा बागुल, नगरसेवक संजय बालगुडे, मुख्तार शेख, संगिता देवकर, निता रजपूत आदी मोहन प्रकाश यांच्या स्वागतासाठी मोठ्या अपेक्षेने उपस्थित होते. मात्र, शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची कोणताही बैठक न घेता मोहन प्रकाश हे तातडीने कोल्हापूरला कार्यक्रमासाठी रवाना झाले. तसेच, पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी तुर्तास कोणतीही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी पडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. -----------------------