Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 02:59 AM2020-05-08T02:59:49+5:302020-05-08T04:05:32+5:30

Visakhapatnam, Vizag Gas Leakage News: या वायू गळतीने भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात २ डिसेंबर १९८४ रोजी रात्री घडलेल्या भयंकर वायुकांडाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या.

Vizag Gas Leak: Tragedy at Visakhapatnam Chemical Factory; Eleven killed in air crash | Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू

Vizag Gas Leak: विशाखापट्टणम रासायनिक कारखान्यातील शोकांतिका; वायुगळतीने ११ जणांचा मृत्यू

googlenewsNext

विशाखपट्टणम/नवी दिल्ली : विशाखापट्टणम येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात झालेल्या वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असून, एक हजारांहून अधिक लोकांना विषबाधा झाली. गुरुवारची पहाट उजाडण्याआधीच बुधवारच्या उत्तररात्री २.३० वाजता ही शोकांतिक घडली. गळती होताच हा विषारी वायू कारखान्याच्या आसपासच्या पाच किलोमीटरच्या परिसरातील गावांत पसरला. विषबाधा होऊ नये म्हणून धावपळ करण्याच्या प्रयत्नात अनेक जण बेशुद्ध होऊन पदपथ, रस्त्यांवर आणि रस्त्यालगच्या खड्ड्यात कोसळले. या वायू गळतीने भोपाळमध्ये युनियन कार्बाईडच्या कारखान्यात २ डिसेंबर १९८४ रोजी रात्री घडलेल्या भयंकर वायुकांडाच्या कटू आठवणी जाग्या झाल्या. भोपाळ वायू दुर्घटनेत तीन हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला होता.

आर.आर. वेंकटपुरम गावानजीक असलेल्या एल.जी. पॉलिमर कारखान्यातून रात्री २.३० वाजता स्टायरिन वायूची गळती सुरू झाल्यानंतर या विषारी वायूची बाधा झाल्याने अनेक जण बेशुद्ध पडले. वायू गळती झाल्याचे कळताच जीव वाचविण्यासाठी अनेकांनी सुरक्षित ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. श्वास गुदमरल्याने अनेक जण जागीच बेशुद्ध होऊन पडले. या धावपळीत कुपनलिकेत पडून दोन बालक, एक वैद्यकिय विद्यार्थी आणि अन्य दोघांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनंतर हा कारखाना सुरू होण्याच्या तयारीत असताना ही वायू दुर्घटना घडल्याने मोठ्या औद्योगिक आपत्तीची भीती वाढली आहे.

वीस जणांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आल्याने मृतांची संख्या वाढू शकते. शिवाय २४६ जणांवर विशाखापट्टणम येथील किंग जॉर्ज इस्पितळात उपाचार केले जात आहेत. वायू गळती घडलेल्या परिसरातून ८०० लोकांना सुरक्षितपणे दुसरीकडे हलविण्यात आले. भरझोपेतच असताना ही दुर्घटना घडल्याने अनेकांनी जीव वाचविण्याकरिता मदतीसाठी टाहो फोडला, तर अनेक जण झोपेतच बेशुद्ध झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालय आणि राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. सर्व जण सुखरूप राहोत, अशी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी यांनी टष्ट्वीट केले. राष्टÑपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी दु:ख व्यक्त करून या दुर्घटनेतील मृतांप्रती शोक व्यक्त केला. वायू गळती कमी करण्यात आली असली तरी एनडीआरएफचे जवान वायू गळती पूर्णत: बंद होईपर्यंत घटनास्थळी असतील, असे राष्टÑीय आपत्ती निवारण दलाचे महासंचालक एस.एन. प्रधान यांनी सांगितले.

गुजरात देणारआंध्रला विशेष रसायन
अहमदाबाद : आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये झालेल्या वायू गळतीचा परिणाम नाहीसा करण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी पीटीबीसी (पॅरा टर्शियरी ब्युटिल कॅटेकोल) हे विशेष ५०० किलोग्रॅम रसायन लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या रसायनाची मागणी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातकडे केली होती. हे रसायन फक्त वापी (जिल्हा वलसाड, दक्षिण गुजरात) येथेच तयार होते. या रसायनाचा उपयोग त्याची गळती व फैलाव रोखण्यासाठी होतो. हे रसायन दमण येथून विमानाने वापीला आणले जाईल व तेथून ते रस्ता मार्गाने घटनास्थळी पाठविले जाईल.

कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा
अकरा जणांचा जीव घेणाºया या वायुदुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी कारखाना व्यवस्थापनासविरुद्ध भादंवि कलम ३०४, ३३७ आणि ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आंध्र प्रदेश उच्च न्यायलयाने या दुर्घटनेची दखल घेत राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे.

1800 किलोलिटर रसायन एका टाकीत असते. यापैकी एका टाकीतून वायू गळती झाली. दरम्यान, दक्षिण कोरियाचे राजदूत शीन बाँग किल यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेची बातमी कळताच धक्का बसला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कंपनीही चौकशी करीत आहे.

भोपाळमधील युनियन कार्बाईडच्या कीटकनाशक कारखान्यातून २-३ डिसेंबर, १९८४ च्या रात्री गळती झालेल्या मिथाईल आयसोसायनेट (मिक) या वायूमुळे जवळपास सहा लाख लोकांना त्याचा त्रास झाला. किती लोकांना वायुबाधा झाली हा आजही वादाचाच विषय आहे. भारत सरकारने अधिकृतरीत्या हे मान्य केले की या वायूची बाधा ५,७४,००० लोकांना झाली व त्यापैकी ५,३०० मरण पावले.

दोनपैैकी एका टाकीतून गळती
स्टायरीन हा रासायनिक पदार्थ सिंथेटिक रबर आणि रेझिन तयार करण्यासाठी वापरला जातो. घसा, त्वचा, डोळे आणि अन्य अवयवांसह चेतासंस्थेवर त्यांचा परिमाण होतो. या कारखान्यात स्टायरीन रसायनाच्या दोन टाक्या आहेत.

 

Web Title: Vizag Gas Leak: Tragedy at Visakhapatnam Chemical Factory; Eleven killed in air crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.