विजय मल्ल्यांची सप्टेंबरपर्यंत 4 हजार कोटी भरण्याची तयारी
By Admin | Updated: March 30, 2016 13:12 IST2016-03-30T12:49:02+5:302016-03-30T13:12:04+5:30
बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत 4 हजार करोड भरण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे
विजय मल्ल्यांची सप्टेंबरपर्यंत 4 हजार कोटी भरण्याची तयारी
>ऑनलाइन लोकमत-
नवी दिल्ली, दि. ३० - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी सप्टेंबरपर्यंत 4 हजार करोड भरण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. न्यायालयाने याप्रकरणी बँकांचं मत मागवलं आहे. न्यायालयाने बँकानां यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. 7 एप्रिलला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात विजय मल्ल्यांचे वकील वैद्यनाथन यांनी ही माहिती जरी दिली असली तरी मल्ल्या भारतात पुन्हा परत येणार आहेत की नाहीत ? या प्रश्नावर मात्र उत्तर देणं त्यांनी टाळलं. त्यामुळे मल्ल्या भारतात पुन्हा परत येणार की नाही ? हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे.
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह १७ बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9 हजार करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.