शहरी कुटुंब देते वर्षाकाठी ४४०० रुपयांची लाच
By Admin | Updated: May 25, 2015 00:41 IST2015-05-25T00:41:58+5:302015-05-25T00:41:58+5:30
शहरी भागातील प्रत्येक कुटुंब वर्षाकाठी ४४०० रुपये, तर ग्रामीण भागातील कुटुंब २९०० रुपयांची लाच देत असल्याचे धक्कादायक तथ्य एका सर्वेक्षणातून प्रकाशात आले

शहरी कुटुंब देते वर्षाकाठी ४४०० रुपयांची लाच
नवी दिल्ली : शहरी भागातील प्रत्येक कुटुंब वर्षाकाठी ४४०० रुपये, तर ग्रामीण भागातील कुटुंब २९०० रुपयांची लाच देत असल्याचे धक्कादायक तथ्य एका सर्वेक्षणातून प्रकाशात आले आहे. बेनामी संपत्तीबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने नेमलेल्या एका संस्थेने लाचेबाबत सादर केलेली आकडेवारीही रोचक अशी आहे. एखादे काम करवून घेण्यासाठी चहा-नाश्ता ही ‘आम’ बात असल्याचे आणि त्याला समाजमान्यता असल्याची बाबही समोर आली.
नॅशनल कौन्सिल आॅफ अप्लाईड इकॉनॉमिक रिसर्च(एनसीएईआर)या संस्थेने लखनौ, पाटणा, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, पुणे यांसारख्या शहरांसह ग्रामीण भागातही सर्वेक्षण पार पाडले. सर्वसाधारण कामे, विविध संस्थांमध्ये प्रवेश आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाधिक लाच दिली जात असल्याचे त्यात उघड झाले.
सरकारने एनसीएईआरसह सार्वजनिक वित्त आणि धोरण राष्ट्रीय संस्था, वित्त व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थांना काळ्या पैशाचा अंदाज लावण्याची जबाबदारी सोपविली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)