वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामधून अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पामधून मोठा दिलासा देताना प्राप्तिकराची मर्यादा ७ लाख रुपयांवरून वाढवून थेट १२ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. त्यावर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अर्थसंकल्पावर खोचक शब्दात टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे गोळीने झालेल्या जखमेवर Band-Aid लावण्याचा प्रकार आहे. जागतिक अनिश्चिततेच्या वातावणार आपल्यासमोरील आर्थिक संकटावर तोडगा काढण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदलांची आवश्यकता होती. मात्र हे सरकार वैचारिक बाबतीत दिवाळखोर झालं आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.
दरम्यान, काँग्रेसकडूनही या अर्थसंकल्पावर कठोर शब्दात टीका करण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प गुंतवणुकीवरीव मंदावलेला व्याजदर, गुंतागुंतीची झालेली जीएसटी प्रणाली, उपभोग्य वस्तूंच्या मागणीमध्ये झालेली घट, किमान मजुरी यासारख्या अर्थव्यवस्थेतील प्रश्नांवर काहीच उपाय सुचवत नाही. या अर्थसंकल्पामधून एनडीएमधील मित्रपक्ष असलेल्या नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारसाठी भरघोस घोषणा केल्या. मात्र या सरकारला दुसरा टेकू देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशकडे दुर्लक्ष केलं, असा टोला देखील काँग्रेसने लगावला.