करणी केल्याच्या आरोपावरून दोन महिलांना जिवंत गाडले

By Admin | Updated: November 4, 2016 06:17 IST2016-11-04T06:17:24+5:302016-11-04T06:17:24+5:30

अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे.

Two women were killed by the accused for doing an act | करणी केल्याच्या आरोपावरून दोन महिलांना जिवंत गाडले

करणी केल्याच्या आरोपावरून दोन महिलांना जिवंत गाडले


गुवाहाटी : अंधश्रद्धा आणि चेटूक यासारख्या अतार्किक व अघोरी गोष्टींच्या जबर पगड्याने आसामच्या आदिवासी जिल्ह्यांत तिघींचा हकनाक बळी घेतला आहे. यापैकी एका घटनेत चेटूक केल्याच्या संशयावरून दोन प्रौढ महिलांना जिवंत गाडण्यात आले. दुसऱ्या घटनेत चोरीला गेलेला मोबाईल फोन सापडावा, यासाठी चार वर्षांच्या मुलीचा बळी देण्यात आला.
पहिली घटना मध्य आसामच्या नागांव जिल्ह्यातील नहरबारी गावातील आदिवासी पाड्यावर गेल्या सोमवारी घडली. पाड्यावर पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या विहिरीत कीडे झाल्याचे आढळले. यामुळेच लोक आजारी पडतात, असा निष्कर्ष काढला गेला. मांत्रिकाने कोणीतरी चेटूक केल्याने विहिरीत कीडे झाल्याचे सांगितले.
पाड्यावरील लोकांनी साल्मी गौर (४७ वर्षे) आणि सागू गौर (५९) या दोन महिलांवर चेटूक केल्याचा संशय घेतला. रहिवाशांनी या दोघींना त्याच विहिरीत ढकलून वरून दगड-माती टाकून गाडून टाकले. त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी बासू गौर व सानू गौर या दोघांना अटक केली. कुमार सानू गौर या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
>१३२ ‘चेटकिणीं’चा मृत्यू
च्खास करून बोडो आणि आदिवासींची वस्ती असलेल्या आसामच्या जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा आणि अघोरी विद्यांचा अशिक्षित लोकांवर जबर पगडा आहे. गावात होणारी रोगराई, मृत्यू वा नापिकी या सर्वांचे खापर चेटूक केले जाण्यावर फोडले जाते. ‘बेज’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या मांत्रिकाला बोलावून ‘चेटूक’ करणारी व्यक्ती ‘शोधून’ काढली जाते. नंतर या व्यक्तीचा अनन्वित छळ करून तिला वाळित टाकले जाते वा प्रसंगी ठारही मारले जाते. सरकारी आकडेवारीनुसार सन २००२ ते २०१२ या १० वर्षांत चेटूक करण्याच्या संशयावरून आसाममध्ये १३२ व्यक्तींना ठार मारण्यात आले आहे. यात महिला व मुलांची संख्या अधिक आहे.

Web Title: Two women were killed by the accused for doing an act