दादरी बळी प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: October 2, 2015 23:44 IST2015-10-02T23:44:49+5:302015-10-02T23:44:49+5:30

गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या इकलाखच्या प्रकरणाचे राजकारण करीत धार्मिक रंग दिला जाऊ नये,

Trying to give political color to the victim's case | दादरी बळी प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

दादरी बळी प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

दादरी : गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या इकलाखच्या प्रकरणाचे राजकारण करीत धार्मिक रंग दिला जाऊ नये, असे आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी शुक्रवारी त्याच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर केले. त्यांनी याप्रकरणी राज्याकडून किंवा सीबीआयमार्फत निष्पक्ष चौकशी करीत दोषीला शिक्षा ठोठावण्याला अनुकूलता दर्शविली.
हा आपल्या संस्कृतीला कलंक असून सभ्य समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये. कुणी हा सुनियोजित कट असल्याचे म्हणत असेल तर मी त्याला सहमत नाही. निष्पक्षरीत्या चौकशी करून दोषींना शिक्षा ठोठावली जावी. तपासाच्या नावाखाली निरपराधांना शिक्षा ठोठावली जाऊ नये, असेही शर्मा म्हणाले. शर्मा यांच्या मतदारसंघात समावेश असलेल्या दादरी येथील या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. अनेक पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया देताना भाजपला लक्ष्य बनविले. (वृत्तसंस्था)‘सबका साथ, सबका विकास’ म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी दादरी येथील प्रकरणावर मौन का बाळगून आहेत. ते विविध धर्मांवर आणि कायदा राखण्यावर विश्वास ठेवतात. त्यांनी निदान टिष्ट्वटरवर तरी शोकसंवेदना व्यक्त करायला हव्या होत्या, असे एआयएमआयएमचे वादग्रस्त नेते असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटले. इकलाखच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर सडकून टीका केली.

Web Title: Trying to give political color to the victim's case