देशावर संघाचा विचार लादण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 28, 2015 23:54 IST2015-05-28T23:54:23+5:302015-05-28T23:54:23+5:30
मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली.

देशावर संघाचा विचार लादण्याचा प्रयत्न
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली. मोदी सरकारने देश संघाच्या हवाली केला आहे. देशावर संघाची विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात केवळ एकच व्यक्ती सर्वज्ञानी आहे. ही व्यक्ती स्वत:ला सर्व विषयातील जाणकार सांगून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.
एनएसयूआयच्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात राहुल यांनी मोदी सरकारवर मोजून-मापून हल्ले केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले.
पंतप्रधानांवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, पंतप्रधान चीन, जपान, अमेरिका, मंगोलिया फिरून आले. पण शेतकरी आणि मजुरांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही. एकीकडे मोदी शिक्षण व्यवस्था बळकट करण्याची भाषा करतात. दुसरीकडे देशाचे भविष्य असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये संघाची विचारधारा थोपण्याचे काम सुरू आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. पण याचे परिणाम ‘शून्य’ येईल, हे मी आजच खात्रीपूर्वक सांगेल. कारण जनतेची भागीदारी गरजेची असताना मोदी सरकार केवळ निवडक उद्योगपतींना सोबत घेऊन हे काम करीतआहे. मोदी सरकारचे गत वर्षभरातील कामकाज याचा पुरावा आहे.
४नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बुधवारच्या भेटीचा हवाला देत, राहुल गांधी यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त करताच, पंतप्रधान मोदी यांनी मनमोहनसिंगांना बोलावून घेत त्यांच्याकडून देशाची अर्थव्यवस्था कशी चालते याचे धडे घेतले, असे ते म्हणाले.
४संघाच्या शाखेत कुणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रांगेत उभे राहून सांगितले ते निमूटपणे करणे, एवढेच शाखेत करावे लागते. शिस्तीच्या नावावर व्यक्तीस्वातंत्र्य संपविण्यावर संघाचा विश्वास आहे. हीच विचारधारा देशावर लादण्याचे प्रयत्न भाजप व मोदी सरकार करीत आहे. काँग्रेसची विचारसरणी मात्र वेगळी आहे.
येथे सगळ्यांचा आवाज ऐकला जातो. कारण हे काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये आहे. वेगवेगळी मते, विचारधारेचा काँग्रेस मेळ घालते. हीच काँग्रेसची शक्ती आहे. आम्ही अंतर्गत लोकशाही मानतो. याउलट संघ आणि भाजपा शिस्तीचा बडगा उभारून विचारस्वातंत्र्य नष्ट करते, असे राहुल म्हणाले.