नवी दिल्ली: भारतात प्रचंड वेगाने पायाभूत सुविधांचा विकास होत असून, याचा फायदा पर्यटन क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातील वेगाने वाढणाऱ्या पर्यटन उद्योगामुळे २०३० पर्यंत या क्षेत्रातून साडेचार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलन मिळू शकते आणि देशाच्या जीडीपीत या क्षेत्राचा वाटा सात टक्क्यांहून अधिक असेल, असे पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये पर्यटन क्षेत्रातून परकीय चलनात मिळकत २,३१,९२७ कोटी रुपये इतकी होती, जी २०२४ मध्ये वाढून २,७७,८४२ कोटी रुपये झाली आहे. २०२४ मध्ये पर्यटनातून परकीय चलन २,७७,८४२ कोटी रुपये मिळाले. यात ८ ते १० टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा आहे. पर्यटनातील वाढ कायम राहिल्यास परकीय चलन मिळकत ४,५०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. ८ कोटी लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे. हे प्रमाण एकूण रोजगाराच्या १२% आहे. १० कोटी आंतरराष्ट्रीय पर्यटकांना २०४७ पर्यंत आकर्षित करण्याचे लक्ष्य भारताने ठेवले आहे.
पर्यटनामुळे कोणते रोजगार मिळतात?थेट रोजगारांमध्ये हॉटेल्स, विमान सेवा कंपन्या, प्रवासविषयक संस्था व टूर ऑपरेटर यांचा समावेश. अप्रत्यक्ष रोजगारामध्ये बांधकाम, अन्न प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे. देशांतर्गत पर्यटनही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत रोजगारनिर्मितीत या क्षेत्राचा वाटा १५ ते २० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. हे क्षेत्र अधिक ग्राहककेंद्रित होत आहे. वेलनेस टुरिझम, ॲडव्हेंचर ट्रॅव्हल, हेरिटेज सर्किट आणि लक्झरी एक्सपीरियन्स यासारख्या नवीन प्रवासाच्या ट्रेंडमुळे ट्रॅव्हल बिझनेससाठी संधी निर्माण होत आहेत.