शपथविधी आज, खातेवाटप नंतर
By Admin | Updated: May 26, 2014 02:02 IST2014-05-26T02:02:27+5:302014-05-26T02:02:27+5:30
मोदी मंत्रिमंडळातील नावे व खातेवाटपाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच प्रत्यक्षात सोमवारी फक्त शपथविधी होईल आणि खातेवाटप पुढील दोन दिवसांत ठरेल,

शपथविधी आज, खातेवाटप नंतर
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली - मोदी मंत्रिमंडळातील नावे व खातेवाटपाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच प्रत्यक्षात सोमवारी फक्त शपथविधी होईल आणि खातेवाटप पुढील दोन दिवसांत ठरेल, असे रात्री उशिरा स्पष्ट झाले. यापूर्वीही अनेकदा अशा पद्धतीने आधी शपथविधी आणि नंतर खातेवाटप असे घडले आहे. मोदी मंत्रिमंडळातील खातेवाटप जाहीर होण्यास त्यामुळे आणखी दोन दिवस लागणार असले तरी काही महत्त्वाच्या खात्यांबाबत निश्चित निर्णय झालेला आहे. त्यानुसार भाजपाचे विद्यमान अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्याकडे गृह, तर नितीन गडकरी यांच्याकडे वाहतूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित एक जम्बो खाते, सुषमा स्वराज यांना संरक्षण तर, अरुण जेटली यांच्याकडे अर्थ खाते सोपविले जाणार आहे. नरेंद्र मोदी परराष्ट्र मंत्रालय स्वत:कडे ठेवण्याची दाट शक्यता आहे. राजनाथसिंह (गृह), नितीन गडकरी (भूपृष्ठ वाहतूक), सुषमा स्वराज (संरक्षण), अरुण जेटली (अर्थ किंवा विदेश), व्यंकय्या नायडू (रेल्वे), स्मृती इराणी (मााहिती आणि प्रसारण राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार) असे खातेवाटप राहील. व्यंकय्या नायडू, रवीशंकर प्रसाद, पीयूष गोयल, भाजपाचा अल्पसंख्यक चेहरा मुख्तार अब्बास नकवी, दार्जिलिंगमधून विजयी झालेले सुरेंद्रजितसिंह अहलुवालिया यांचीही वर्णी लागू शकते. आडवाणी यांच्यासह मुरली मनोहर जोशी यांनीही मार्गदर्शकाची भूमिका बजावावी असे मोदींना वाटते. गोपीनाथ मुंडे यांच्यावर केंद्रात जबाबदारी द्यायची की राज्यात, या संभ्रमात पक्ष असताना गडकरी यांनी टोकाची भूमिका घेत मुंडे नसतील तर मीही नाही, अशा भाषेत मुंडे यांच्यासाठी आग्रह धरला, असे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानविरोधी भूमिकेला मुरड घालत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. पक्षाच्या सर्व खासदारांना सोहळ्यास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही नवी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अरुण शौरी हे अर्थमंत्री बनणार म्हणून चर्चेत आले. त्यानंतर त्यांनी टीव्ही वाहिन्यांना मुलाखती देण्याचा सपाटाच लावला. आता जेटलींकडे हे खाते आल्यामुळे शौरींना हात चोळण्यावाचून पर्याय उरला नाही. शौरींकडे विशेष जबाबदारी असलेल्या आयोगाचे काम सोपवले जाऊ शकते. राजनाथ यांच्याकडे अंतर्गत सुरक्षा सांभाळण्यासाठी अजित डोवाल हे खास अधिकारी असतील. पंतप्रधानांचे राष्टÑीय सुरक्षा सल्लागार हे महत्त्वाचे पद डोवाल यांच्याकडे असेल.