उल्हासनगरातील इच्छुकात चढाओढ
By Admin | Updated: September 22, 2014 09:47 IST2014-09-22T05:10:17+5:302014-09-22T09:47:59+5:30
पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून शहर सेनेने मिडटाऊनमध्ये बैठक घेऊन चाचपणी सुरू केली आहे.

उल्हासनगरातील इच्छुकात चढाओढ
सदानंद नाईक, उल्हासनगर
पक्षातील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला असून शहर सेनेने मिडटाऊनमध्ये बैठक घेऊन चाचपणी सुरू केली आहे. पालिकेतील मित्रपक्ष साई पक्षाने निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्याने कुमार आयलानींची कोंडी झाली आहे.
उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून पप्पू कालानी यांना हद्दपार करण्यासाठी शिवसेना-भाजपा, साई पक्षासह रिपाइंचे गट-तट गेल्या निवडणुकीत एकत्र आले होते. कलानीविरुद्ध इतर सर्व पक्ष असे चित्र गेल्या निवडणुकीत होते. पप्पू कलानी जन्मठेपेच्या शिक्षाप्रकरणी जेलची हवा खात असून कलानी कुटुंबाकडून ओमी कलानी यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडून ओमी कलानी यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू जग्यासी, मोहन खंडारे तर भाजपाकडून विद्यमान आमदार कुमार आयलानी यांच्यासह शहराध्यक्ष जमनू पुरस्वानी इच्छुक उमेदवार आहेत. सेनेतर्फे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी महापौर व स्थायी समितीच्या सभापती राजश्री चौधरी, उपशहरप्रमुख दिलीप गायकवाड, राजेंद्रसिंग भुल्लर इच्छुक आहेत. रिपाइंचे शहराध्यक्ष नाना बागुल व साई पक्षाचे जीवन इदनानी यांनीही निवडणूक लढवण्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
महापालिकेचे माजी सचिव प्रकाश कुकरेजा यांनी निवडणुकीच्या आराखड्यात उडी घेत सोच बदलो शहर बदलो... असा नारा दिला आहे. मनसेच्या वतीने शहराध्यक्ष संजय घुगे व मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू देशमुख इच्छुक उमेदवार आहेत. साई पक्षाचे जीवन इदनानी व प्रकाश कुकरेजा यांनी भाजपाकडे तिकिटाची मागणी केली आहे. महायुती फिसकटली तर निवडणूक लढवण्याचा पवित्रा शहर सेनाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी घेतला आहे.