राम मंदिरासाठी कायदयाच्या मागणीला संघाचा पाठिंबा नाही

By Admin | Updated: September 13, 2016 06:23 IST2016-09-13T04:13:19+5:302016-09-13T06:23:47+5:30

भगवान श्रीरामाला आठ हजार वर्षांपासून हिंदू प्रजेने आदर्श मानले. इथे जन्मलेले पुरुषोत्तम श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर सर्वांचेच आहेत

There is no support from the law demand for Ram Mandir | राम मंदिरासाठी कायदयाच्या मागणीला संघाचा पाठिंबा नाही

राम मंदिरासाठी कायदयाच्या मागणीला संघाचा पाठिंबा नाही

सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भगवान श्रीरामाला आठ हजार वर्षांपासून हिंदू प्रजेने आदर्श मानले. इथे जन्मलेले पुरुषोत्तम श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध, महावीर सर्वांचेच आहेत. आपल्या श्रद्धा, पूजा, जीवनक्रमाच्या वाटचालीत कोणताही बदल न करता, भारताचे सारे रहिवासी प्रथमत: हिंदू आहेत, ही बाब मान्य केली, तर हिंदुंच्या या देशात राम मंदिर झालेच पाहिजे. तथापि, जो वाद आज न्यायप्रविष्ट आहे, त्याचा निवाडा करणाऱ्या न्यायालयाला टाळून रामजन्मभूमीसाठी संसदेला नवा कायदा करण्यास भाग पाडा, या रामजन्मभूमी न्यासाचे कार्याध्यक्ष रामविलास वेदान्ती यांनी संमेलनात मांडलेल्या प्रस्तावाला मी पाठिंबा देत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
विज्ञान भवनात संत गुलाबराव महाराज जीवनशताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित ९ व्या संत साहित्य संमेलनाच्या समारोप सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संमेलनात ६ परिसंवादानंतर एकूण ९ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागेवर राम मंदिर बांधण्याचा आग्रह धरणारा प्रस्तावही त्यात होता. केंद्र व राज्य सरकारांकडून या प्रस्तावांना सरसंघचालकांनी मान्यता मिळवून द्यावी, असा आग्रह डॉ. रामविलास वेदान्ती, आचार्य धर्मेंद्र आदींनी भाषणातून धरला. तेव्हा राम मंदिराचा प्रस्ताव वगळता, बाकीचे सारे प्रस्ताव आपल्याला मान्य असल्याचे भागवतांनी जाहीर केले.
गुलाबराव महाराजांच्या साहित्यकृतीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत भागवत म्हणाले, ‘आमच्या ॠषी मुनींनी सतत विश्वाचे कल्याण व्हावे, हाच विचार केला. विनम्र राहा, अहंकार बाळगू नका, अशी शिकवण ही संस्कृती देते. तीन प्रकारच्या कर्मशक्तीत चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करण्याची आणि वाईट गोष्टी रोखण्याची क्षमता आहे. संत गुलाबराव महाराजांनी निर्माण केलेल्या साऱ्या साहित्यकृती याचाच पुरस्कार करणाऱ्या आहेत. आपल्या अल्प आयुष्यात महाराजांनी देश-विदेशातील ज्ञानाचा परामर्श घेउन जे अभंग, ओव्या, पदे व ज्या साहित्याची निर्मिती केली, ते प्रेरणादायी आहे.’

महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वारकऱ्यांचा सहभाग
समारोप सोहळयाचे स्वागत व प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी केले. समारोपप्रसंगी महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, सर्वोदय ट्रस्टचे नारायण महाराज मोहोड, डॉ. विजय भटकर, आचार्य धर्मेंद्र, डॉ. रामविलास वेदान्ती व बंगलोरच्या नाव एकता मिशनचे महायोगी मधुकरनाथजी यांची संत गुलाबराव महाराजांच्या कर्मयोगाचा गौरव करणारी भाषणे झाली. सूत्रसंचालन किशन शर्मांनी केले.
दुसऱ्या दिवसाचा प्रारंभ ‘तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थ क्षेत्राकडे’ या परिसंवादाने झाली. त्याचे अध्यक्षस्थान डॉ. विजय भटकरांनी भूषवले.‘सर्व धर्मग्रंथ हे खऱ्या अर्थाने जीवन ग्रंथ’ या परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड होते. या परिसंवादांमधे मुख्यत्वे अविनाश धर्माधिकारी, इंद्रेशकुमार, डॉ.एस.एन.पठाण, नारायण महाराज जाधव, डॉ. संजय उपाध्ये, रामेश्वर शास्त्री आदींचा सहभाग होता. संमेलनात महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वारकऱ्यांसह दिल्ली परिसरातील निमंत्रितही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: There is no support from the law demand for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.