बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:42+5:302015-02-16T21:12:42+5:30

२० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी

There is no President's rule in Bihar | बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही

बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट नाही

फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार- जितनराम मांझी
नवी दिल्ली- बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मी भाजपाच्या संगनमताने षडयंत्र रचत असल्याची अफवा पसरवून आमदारांना घाबरविण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांच्या गोटातून केला जात आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी सोमवारी येथे केला. विरोधकांकडून राष्ट्रपती व राज्यपालांसमक्ष बनावट आमदारांची परेड करविण्यात आल्याचाही त्यांचा दावा आहे.
शासकीय कामानिमित्त आपण राजधानीत असून काही केंद्रीय मंत्री आणि राज्यपालांची भेट घेतल्याचे मांझी यांनी सांगितले. या भेटीगाठींनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला पाठिंबा द्यायचा की नाही हे भाजपाने ठरवायचे आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा माझ्यावरील आरोप धादांत खोटा आहे. माझी इच्छा असती तर फार पूर्वीच तशी शिफारस केली असती. पण मी २० फेब्रुवारीला विश्वासमत जिंकणार आहे. सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा,असे आवाहन मांझी यांनी केले.
मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे मांझी यांना संयुक्त जनता दलातून (संजद) बडतर्फ करण्यात आले आहे.
संजदचे विधिमंडळ पक्ष नेते नितीशकुमार यांनी १३० आमदार त्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला असून या सर्वांना घेऊन त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली होती. याकडे लक्ष वेधले असता यापैकी काही आमदार बनावट असल्याचा दावा मांझी यांनी केला.
मांझी भाजपाच्या तालावर नाचत असल्याचा आरोप संजदने रविवारी केला होता. संजद आणि त्याचे मित्र पक्ष राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि भाकपाने राज्यातील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल त्रिपाठी आणि भाजपाला जबाबदार धरले आहे.
(वृत्तसंस्था)

Web Title: There is no President's rule in Bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.