आणीबाणीसाठी माफी मागण्याची गरज नाही - खुर्शीद
By Admin | Updated: July 14, 2015 01:57 IST2015-07-14T01:57:13+5:302015-07-14T01:57:13+5:30
काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच

आणीबाणीसाठी माफी मागण्याची गरज नाही - खुर्शीद
हैदराबाद : काँग्रेसने १९७५ साली लावलेल्या आणीबाणीसाठी देशाची माफी मागण्याची गरज नाही. कारण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, हे लोकांना कालांतराने कळलेच आणि म्हणूनच इंदिरा गांधी यांना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी जनतेने काँग्रेसला निवडून दिले, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी आणीबाणीच्या निर्णयाबद्दल काँग्रेसचा बचाव केला. सोमवारी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
आम्ही माफी का मागावी? आम्ही आणीबाणीवर चर्चा का करावी? काही गोष्टी निश्चितपणे घडल्या; मात्र यानंतर भारतातील जनतेनेच इंदिरा गांधींना पुन्हा पंतप्रधानपदी बसवले. त्यामुळे आम्ही माफी मागत असू तर भारताच्या जनतेलाही माफी मागायला हवी. त्यांनी इंदिरांना का निवडून दिले? असा सवाल खुर्शीद यांनी यावेळी केला. इतिहासात जाण्याची गरज नाही. कारण त्यावेळी गरजेचे होते, तेच तत्कालीन सरकारने केले. आणीबाणीचा निर्णय अयोग्य होता, असे वाटले तेव्हा लोकांनी आम्हाला झिडकारले; पण आणीबाणीचा निर्णय योग्यच होता, याचा अनुभव येताच काँग्रेसला पुन्हा निवडून दिले.