काश्मीरशिवाय चर्चा नाही

By Admin | Updated: July 14, 2015 03:25 IST2015-07-14T03:25:35+5:302015-07-14T03:25:35+5:30

भारत व पाकिस्तानच्या नेत्यांची रशियात बैठक होऊन जेमतेम ७२ तास उलटताच सर्व आश्वासनांपासून घुमजाव करत काश्मीर मुद्दा समाविष्ट असल्याखेरीज भारत-पाक

There is no discussion except Kashmir | काश्मीरशिवाय चर्चा नाही

काश्मीरशिवाय चर्चा नाही

इस्लामाबाद : भारत व पाकिस्तानच्या नेत्यांची रशियात बैठक होऊन जेमतेम ७२ तास उलटताच सर्व आश्वासनांपासून घुमजाव करत काश्मीर मुद्दा समाविष्ट असल्याखेरीज भारत-पाक चर्चा होणार नाही, अशी भूमिका घेत पाकिस्तानने आपला मूळ रंग दाखविला आहे. रशियातील बैठकीत दिलेल्या आवासनाकडे पाठ फिरवतानाच मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याला चालना देण्यासाठी भारताकडून आणखी पुरावे लागतील असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात दोन पानी निवेदन जारी केले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या रशियातील उफा येथे झालेल्या बैठकीस सरताज अजीज उपस्थित होते. शरीफ व मोदी यांच्या वाटाघाटीनंतर दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यात मुंबईवरील २६-११ च्या हल्ल्याच्या खटल्याला वेग देणे हा मुद्दा प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आला होता.
मात्र, मुंबई खटला पूर्ण करण्यास आम्हाला अधिक माहिती व अधिक पुरावे हवेत. त्यासाठी भारतानेच पुरावे द्यावेत असे सांगत अजीज यांनी जबाबदारी भारतावर ढकलली आहे. अजीज यांचे हे निवेदन पाकने रविवारी मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लखवीच्या आवाजाचा नमुना देता येणार नाही असे जाहीर केल्यानंतरचे आहे. तसेच लखवीला पाक न्यायालयाने जामिनावर सोडून दिले असून, त्याला खटल्याला उपस्थित राहण्यापासूनही सूट देण्यात आली आहे.

काश्मीर हाच मुख्य मुद्दा
प्रलंबित प्रश्नात काश्मीर हा आमच्या दृष्टीने मुख्य मुद्दा आहे. सियाचिन, सर खाडी, पाण्याचे वाटप हेही मुद्दे आहेतच. पाकिस्तान या मुख्य मुद्द्याबाबत भूमिकेवर कायम असून, त्याबाबत कोणतीही तडजोड करणार नाही.
- सरताज अजीज, पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

गदारोळानंतर उपरती
-रशियातील उभय देशांच्या नेत्यांची बैठक व नंतर प्रसिद्ध झालेले संयुक्त निवेदन यात काश्मीर मुद्द्याचा उल्लेखच केला नव्हता. त्यामुळे स्वगृही परतल्यानंतर पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर पाकिस्तानने अजीज यांच्यामार्फत घूमजाव करीत आमच्या काश्मिरी बंधूना राजकीय, नैतिक व राजनैतिक पाठिंबा देणे चालू ठेवणार आहोत असे स्पष्ट केले आहे. शरीफ यांनी समझोता एक्स्प्रेसच्या खटल्याची प्रगतीही विचारली होती, असे अजीज आता म्हणत आहेत.

- भारतीय नेत्यांचे प्रक्षोभक वक्तव्य व भारताचा पाकिस्तानमधील हस्तक्षेप याची पाकिस्तानला तीव्र चिंता आहे. बलुचमधील दहशतवादाला भारत अजूनही पाठिंबा देत आहे, असा आरोप अजीज यांनी केला आहे. या चिंतेवर चर्चा करण्यास भारत व पाक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक प्रथम नवी दिल्ली येथे व नंतर इस्लामाबाद येथे आहे.

पाकिस्तानी राजदूताकडून फुटीरवाद्यांना निमंत्रण
- भारताच्या नाराजीची पर्वा न करता पाकिस्तानच्या भारतातील राजदूताने काश्मीर खोऱ्यातील फुटीरतावादी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांना २१ जुलैला ईद ए मिलानचे निमंत्रण दिले आहे. काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी चर्चा केल्यानंतर भारताने निषेध म्हणून पाकशी चर्चा बंद केल्याचे प्रकरण ताजे असतानाच ही आगळीक करण्यात आली आहे.
- पाक उच्चायुक्त बासित यांनी फुटीरवाद्यांना आधी रमजानच्या काळात इफ्तारचेही निमंत्रण दिले होते. पण, मोदी व नवाज शरीफ यांची रशियातील उफा येथे भेट होणार हे ठरल्यानंतर इफ्तार पार्टी रद्द करण्यात आली.

2014 - आॅगस्ट महिन्यात पाकिस्तानी दूत व हुर्रीयत नेते यांचे गुफ्तगू चालल्याचे लक्षात आल्यानंतर भारताने उभय देशांतील परराष्ट्र सचिव पातळीवरील बोलणी रद्द केली होती.

Web Title: There is no discussion except Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.