जलाशय संवर्धनासाठी प्राधिकरणच नाही
By Admin | Updated: February 28, 2015 00:56 IST2015-02-28T00:56:11+5:302015-02-28T00:56:11+5:30
दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणा-या शहरांत जलाशयांचा विकास व संवर्धनासाठी प्राधिकरणाच्या स्थापनेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे.

जलाशय संवर्धनासाठी प्राधिकरणच नाही
नवी दिल्ली : दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणा-या शहरांत जलाशयांचा विकास व संवर्धनासाठी प्राधिकरणाच्या स्थापनेची वर्षानुवर्षांपासून प्रतीक्षा आहे. जलाशय वाचविण्याच्या योजनेसाठी काही बिगर सरकारी संघटनांचे पॅनेल मात्र स्थापन करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती नगरविकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी विजय दर्डा यांनी राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
आॅगस्ट २०१२ मध्ये एका बैठकीत प्राधिकरण स्थापण्याबाबत सहमती झाली होती याचे स्मरण करवून देत खा. दर्डा यांनी जलाशयांच्या संरक्षणासंबंधी राष्ट्रीय दृष्टिकोन पाहता अशा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली काय, यावर सुप्रियो यांनी दिल्लीत कोणत्याही जलाशय विकास प्राधिकरणाची स्थापना झालेली नाही मात्र तीन बिगर सरकारी संघटनांचे पॅनेल तयार करण्यात आले आहे, अशी माहिती दिल्ली सरकार व विकास प्राधिकरणाकडून मिळाली असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)