तामिळनाडूमध्ये भरदिवसा बाजारात तरूणाची हत्या, ' ऑनर किलींग'चा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2016 14:14 IST2016-03-14T10:02:54+5:302016-03-14T14:14:21+5:30
तामिळनाडूमधील येथे भरदिवसा एका नवविवाहीत जोडप्यावर हल्ला करून तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून ऑनर किलींगचा संशय व्यक्त होतो.

तामिळनाडूमध्ये भरदिवसा बाजारात तरूणाची हत्या, ' ऑनर किलींग'चा संशय
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. १४ - तामिळनाडूमध्ये भरदिवसा एका नवविवाहीत जोडप्यावर हल्ला करून तरूणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. तिरूपूर येथील उदुमालपेट येथील बस स्थानकाजवळ रविवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. मुलीच्या वडिलांनी हत्येप्रकरणी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. ऑनर किलींग' ची ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या हल्ल्यानंतर त्या दोघांना रुग्णालयात नेत असतानाच तरूणाचा मृत्यू झाला तर पतीला वाचवण्याच्या प्रयत्नांत गंभीर जखमी झालेल्या त्या तरूणीवर उपचार सुरू आहेत. त्या जोडप्यावर हल्ला करणा-या तिघांनी घटनास्थळाहून तातडीने मोटरबाईकवरून पळ काढला. व्ही. शंकर (वय २२) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरूणाचे नाव असून उदुमालपेट येथून १५ किमी अंतरावर असलेल्या कुमारलिंगम गावचा रहिवासी होता.
दलित असलेल्या शंकरने दिंडीगुल जिल्ह्यातील १९ वर्षीय कौसल्या हिच्याशी ८ महिन्यांपूर्वी लग्न केले होते. मात्र आंतरजातीय विवाह असल्याने कौसल्याच्या घरच्यांनी मात्र या विवाहास तीव्र विरोध केला होता. शंकरच्या घरच्यांनी मात्र हे लग्न स्वीकारल्याने शंकर व कौसल्या दोघेही कुमारलिंगम गावात सुखाने संसार करत होते. लग्नानंतर कौसल्याने कॉलेजला जाणे बंद केले, मात्र शंकरने त्याचे शिक्षण सुरूच ठेवले. रविवारी दुपारी ते दोघे काही कामानिमित्त उदुमालपेट येथे गेले होते, मात्र बस स्टँडजवळच हल्लेखोरांनी त्यांना गाठून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
बसस्टॅंडवरील कोणीही नागरिक त्यांच्या मदतीसाठी पुढे न आल्याने शंकरचा हकनाक बळी गेला तर कौसल्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. लग्न झाल्यापासूनच कौशल्याच्या कुटुंबियांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, अशी माहिती शंकरच्या वडिलांनी दिली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून छायाचित्रांच्या सहाय्याने पोलिस त्या तीन हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.