देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे, तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. केरळमध्ये सर्वाधिक १३३६ सक्रिय रुग्ण आहेत.
कर्नाटक सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये, लोकांना नियमितपणे हात धुण्याची सवय लावण्याचा, खोकताना/शिंकताना शिष्टाचार पाळण्याचा, गर्दी टाळण्याचा आणि आवश्यक असल्यास मास्क वापरण्याचा सल्ला दिलाय.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील एका ७१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू न्यूमोनिया, सेप्टिक शॉक आणि किडनीच्या तीव्र आजारामुळे झाला. कर्नाटकातील एका ६३ वर्षीय रुग्णाचा, केरळमधील एका ५९ वर्षीय रुग्णाचा आणि उत्तर प्रदेशातील एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
कोणत्या राज्यात किती रुग्ण संख्या?
केरळ- १,३३६, महाराष्ट्र- ४६७, दिल्ली- ३७५, गुजरात- २६५, कर्नाटक- २३४, पश्चिम बंगाल- २०५, तामिळनाडू- १८५ ,उत्तर प्रदेश- ११७, राजस्थान- ६०, पुडुचेरी- ४१, हरयाणा- २६, मध्य प्रदेश- १६, झारखंड- ६, पंजाब- ५