बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ला काही महिने शिल्ल्क असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासंदर्भात सस्पेन्स वाढवले आहे. बिहारमधील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासंदर्भातील प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शाह म्हणाले, "बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होईल हे काळ ठरवेल. तथापि, बिहार निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल," असेही शहा यांनी स्पष्ट केले आहे.
अमित शाह यांच्या या उत्तराने नितीश आणि त्यांच्या पक्षाचे टेन्शन वाढू शकते. जेडीयू सतत्याने '२५ से ३०, फिर से नीतीश' असा प्रचार करत आहे. याच बरोबर, दिलीप जैस्वाल, सम्राट चौधरी यांसारख्या बिहार भाजप नेत्यांनीही '२०२५ फिरसे नितीश', असा दावा केला आहे.निवडणुकांचे मुद्दे नेहमीच जनता निश्चित करते - -खरे तर, दोन दिवसांपूर्वी इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अमित शहा यांनी बिहार निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासंदर्भात दिलेल्या उत्तराने राजकीय वातावरण तापले आहे. या मुलाखतीत शाह यांना विचारण्यात आले होते, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचा मुद्दा विकास असेल की जात? यावर शाह म्हणाले, निवडणुकांचे मुद्दे नेहमीच जनता निश्चित करते. मात्र, बिहारच्या जनतेसाठी विकास, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे, असे आम्हाला वाटते.
बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ? - दरम्यान, बिहारमध्ये एनडीएचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? असे विचारण्यात आले असता शाह म्हणाले, "बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल हे वेळच ठरवेल. मात्र, आम्ही मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहोत."