दिल्लीतील व्यापारी हरप्रीत सिंह तलवार उर्फ कबीर तलवार यांचा जामीन अर्ज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. २१,००० कोटी रुपयांच्या मुंद्रा बंदरातील ड्रग्ज प्रकरणात तलवार दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, सध्या त्यांच्याविरुद्ध दहशतवादी संघटनेला निधी पुरवल्याचा आरोप अकाली आहे. मात्र, न्यायालयाने तलवार यांना सहा महिन्यांनंतर पुन्हा जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे.
सुनावणीदरम्यान, न्यायालयाने असेही निर्देश दिले की, विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करावी आणि दर महिन्याला दोनदा खटल्यावर सुनावणी करावी. यापूर्वी २३ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. या प्रकरणात, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) न्यायालयाला सांगितले होते की, हरप्रीत सिंह तलवार यांना ड्रग्जच्या विक्रीतून मिळालेला पैसा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाला निधी देण्यासाठी वापरला जात होता.
२०२२ मध्ये एनआयएने केलेली अटककबीर तलवार दिल्लीत एक प्रसिद्ध नाईट क्लब चालवत होते. ऑगस्ट २०२२मध्ये त्यांना एनआयएने अटक केली होती. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ड्रग्ज रिकव्हरी प्रकरणात हरप्रीत सिंह तलवार आरोपी आहे. सप्टेंबर २०२१मध्ये मुंद्रा बंदरावर अफगाणिस्तानातून इराणमार्गे येणाऱ्या कंटेनरमध्ये तपासणी दरम्यान तब्बल २,९८८ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले होते, ज्याची किंमत सुमारे २१,००० कोटी रुपये होती. एजन्सींना जप्त करण्यात यश आलेला हा सहावा आणि शेवटचा कंटेनर होता. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे, ज्यात काही अफगाण नागरिकांचाही समावेश आहे.