तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला
By Admin | Updated: May 25, 2014 04:11 IST2014-05-25T04:11:49+5:302014-05-25T04:11:49+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत

तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारच्या मदतीला
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन संस्था पुढील आठवड्यात सत्ता सांभाळत असलेल्या मोदी सरकारला अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात आणि या सरकारला नवी ताकद देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. केरळमधील भारतीय विचार केंद्रम, मुंबईतील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि दिल्लीतील इंडिया पॉलिसी फाऊंडेशन या तीन संघ समर्थक संस्था मोदी सरकारला मौल्यवान माहिती पुरवून इतर मदत करून बौद्धिक क्षेत्राचे नियंत्रण करणार आहे. १९७३ मध्ये स्थापन झालेल्या दीनदयाल संशोधन संस्थेने ग्रामीण भागात केलेल्या आपल्या कार्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले होते. दिवंगत प्रमोद महाजन यांनी १९८० च्या अखेरीस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या मानाने इंडिया पॉलिसी फाऊंडेशन ही तशी नवी परंतु सर्वांत जास्त सक्रिय असलेली संस्था आहे आणि दत्तात्रय होसबोले, मनमोहन वैद्य, सुरेश सोनी आणि बजरंजलाल गुप्ता यांच्यासारखे संघाचे वरिष्ठ नेते या संस्थेच्या बोर्ड आॅफ गव्हर्नर्सवर आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू कपिल कपूर आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक राकेश सिन्हा हे इंडिया पॉलिसी फाऊंडेशनचे काम पाहतात. महत्त्वाच्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करणे, उर्दू प्रेसची देखरेख, मोफत आरोग्याचा अधिकार यासारख्या मुद्यांवर संशोधन करण्याचे काम ही संस्था करीत असते. इंडिया पॉलिसी फाऊंडेशन सरकारपासून अंतर राखेल आणि संशोधन व मतेमतांतराला आकार देण्याचे काम करेल. फाऊंडेशनने वैचारिक चळवळीमधील संप्रदायवाद नष्ट करण्यासाठी सकारात्मक चर्चा घडवून आणण्याचे काम केले आहे. सरकारमध्ये परिवर्तन म्हणजे इंडिया पॉलिसी फाऊंडेशनसारख्या राष्टÑवादी थिंकटँकने सकारात्मक परिवर्तन आणि विवेचनात्मक धोरण निर्धारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणे होय, असे सिन्हा म्हणाले. ज्या ऐतिहासिक परिवर्तनाची नितांत गरज होती, ते परिवर्तन देशात घडून आलेले आहे. खर्या भारताने सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये स्वत:ला अभिव्यक्त करण्याची ही सुवर्ण संधी आहे, असे मत भारतीय विचार केंद्रमचे पी. परमेश्वरन यांनी व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)