राज्यपालांच्या नेमणुकांत सबुरीचे धोरण
By Admin | Updated: June 24, 2014 01:51 IST2014-06-24T01:51:57+5:302014-06-24T01:51:57+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांचा राजीनामा स्वीकारला आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याकडे तेथील अतिरिक्त जबाबदारी सोपविली.

राज्यपालांच्या नेमणुकांत सबुरीचे धोरण
>नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी छत्तीसगडचे राज्यपाल शेखर दत्त यांचा राजीनामा स्वीकारला आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याकडे तेथील अतिरिक्त जबाबदारी सोपविली.
माजी काँग्रेसी यादव यांच्याकडे मोदी सरकारने दोन राज्यांचा प्रभार दिला आहे. अशाप्रकारे दोन राज्यांची जबाबदारी सांभाळणारे ते दुसरे माजी काँग्रेसी ठरले आहेत. याआधी उत्तराखंडचे राज्यपाल अजिज कुरेशी यांच्याकडे उत्तर प्रदेशचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. बी.एल. जोशी यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. कुरेशी यांनी सोमवारी शपथ घेतली. काँग्रेसनियुक्त दोन राज्यांच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन मोदी सरकारने चतुर राजकीय खेळी खेळली आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. पंतप्रधानांना अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात राज्यपालांच्या मुद्दय़ांवरून कोणताही वाद ओढवून घ्यायचा नाही. केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी काही राज्यपालांना दूरध्वनीवरून राजीनामा देण्याची सूचना केल्याने वाद झाला होता. दोन राज्यपालांनी राजीनामा दिला, तर अन्य राज्यपालांनी राजीनामा देण्यास नकार दिला. म्हणून पंतप्रधानांनी भाजपा प्रियजनांची नवीन राज्यपालपदी नियुक्ती करण्याची घाई टाळली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)