पंतप्रधान मोदींचे मौन सुटेपर्यंत संघर्ष -काँग्रेस
By Admin | Updated: July 2, 2015 02:09 IST2015-07-02T02:09:38+5:302015-07-02T02:09:38+5:30
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याकडून एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत असतानाच काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे.

पंतप्रधान मोदींचे मौन सुटेपर्यंत संघर्ष -काँग्रेस
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्याकडून एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत असतानाच काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्ला अधिक तीव्र केला आहे. पक्ष नेतृत्वाने आपल्या काही वरिष्ठ नेत्यांना राज्य शाखेच्या सहकार्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे या भाजप नेत्यांविरुद्ध झालेल्या आरोपांबाबत अधिकाधिक कागदोपत्री पुरावे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे या कलंकित मंत्र्यांना डच्चू देण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहू नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचे डावपेच काँग्रेसने आखले असल्याचे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. या मुद्यावर विरोधी पक्ष एकजूट असल्याचा विश्वास व्यक्त करतानाच भाजपा अपप्रचाराद्वारे विरोधकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असली तरी ते शक्य नाही असेही पक्षाने स्पष्ट आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही याची पुष्टी केली. ललितगेट प्रकरणासोबतच भाजपाशासित राज्यांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा हाती लागल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारविरुद्ध दंड थोपटले आहेत.
काँग्रेसचे माध्यम प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधानांचा उल्लेख मौनी मोदी असा करून त्यांच्या मौनामागील कारण काय? असा सवाल उपस्थित केला. त्यांनी काँग्रेसप्रणीत संपुआ सरकारमध्ये मंत्री राहिलेले पी. चिदंबरम आणि ब्रिटिश चान्सलर यांच्यादरम्यान ललित मोदींबाबत झालेली चर्चा सार्वजनिक करण्याची मागणीही केली. सुरजेवाला यांनी सरकारला सहा प्रश्नांची उत्तरेही मागितली. सायंकाळी काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनीही हा मुद्दा उपस्थित करून सरकारवर आगपाखड केली.