ऑनलाइन टीमनवी दिल्ली, दि. १७ - पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पदाचा राजीनामा देण्यापूर्वी राष्ट्राला उदेशून केलेल्या शेवटच्या भाषणादरम्यान देशाची प्रगतीपथावरील वाटचाल कायम राहो अशी आशा व्यक्त केली. भाजपाच्या नेत्रदीपक यशानंतर काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या सलग १० वर्षांच्या सत्तेची अखेर झाली असून आज पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटून, त्यांना आपल्या सरकारचा राजीनामा सादर करणार आहेत.
त्यापूर्वी केलेल्या भाषणात मावळत्या पंतप्रधानांनी देशातील सर्व नागरिकांचे आभार मानले. ते म्हणाले, ' दहा वर्षांपूर्वी मी पंतप्रधान पदाची जबाबादारी स्वीकारली. ती पार पाडण्यासाठी मी कठोर मेहनत व सत्याच्या मार्गावर चालम्याचा निर्णय घेतला होता. मी यापुढेही असेच काम करत राहू शकेन अशी मला आशा आहे. या निवडणुकीत जनतेने जो निर्णय दिला आहे त्याचा आम्ही सर्वजण आदर करतो. या देशाने मला आत्तापर्यंत भरभरून दिले, ते ऋण मी कधीच फेडू शकणार नाही.