आपमध्ये पडझड सुरूच
By Admin | Updated: May 25, 2014 04:04 IST2014-05-25T04:04:53+5:302014-05-25T04:04:53+5:30
ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीची (आप) पडझड होत असल्याचे चित्र आहे़

आपमध्ये पडझड सुरूच
दिल्ली/बेंगळुरू : ताज्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीची (आप) पडझड होत असल्याचे चित्र आहे़ पक्ष नेते जी़आऱ गोपीनाथ यांच्यापाठोपाठ ‘आप’च्या स्टार प्रचारक आणि केजरीवाल यांच्या विश्वासू मानल्या जाणार्या शाजिया इल्मी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे़ उभय नेत्यांनी पक्ष दिशाहीन होत असल्याचा आरोप केला असून केजरीवाल यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ विशेष म्हणजे, एका मानहानीप्रकरणी जातमुचलका भरण्यास नकार दिल्यामुळे अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत़ असे असताना इल्मी व गोपीनाथ यांनी शनिवारी पक्ष सोडण्याची घोषणा केली़ दिल्लीत एका पत्रपरिषदेत शाजिया इल्मी यांनी आपच्या सर्व पदांचा राजीनमा देत असल्याचे जाहीर करीत,पक्षावर गंभीर आरोप केले़ पक्षात अंतर्गत लोकशाही नसून केजरीवाल एका चौकडीचे ऐकतात़ त्यांच्या सांगण्यावरून घिसाडघाईने निर्णय घेतात़ पक्ष स्वराज्याच्या गोष्टी करतो़ पण पक्षात कुठेही स्वराज्य नाही़ एक दिशाहीन पक्ष अशी आम आदमी पार्टीची ओळख बनून राहिली आहे़ या सर्वांमुळेच मी पक्ष सोडत आहे, असे इल्मी यांनी यावेळी जाहीर केले़ केजरीवालांनी ‘चौकडी’ तोडून आत्मचिंतन करावे, असा सल्लाही त्यांनी दिला़ अन्य दुसर्या पक्षात जाणार का? असे विचारले असता इल्मी यांनी त्यास नकार दिला़ ताज्या विधानसभा निवडणुकीत इल्मी यांना दिल्लीतून लढण्याची इच्छा होती़ मात्र पक्षाने त्यांना गाझियाबादेतून तिकीट दिले होते़ पण याठिकाणी त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते़ इल्मींच्या आधी कॅप्टन गोपीनाथ यांनीही आम आदमी पार्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला़ पक्ष नेतृत्वाची कार्यपद्धती आणि त्यातून निर्माण झालेल्या मतभेदांमुळे आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले़ ‘हैज केजरीवाल लॉस्ट हिज वे’ (केजरीवाल मार्ग भरकटले का?) या ब्लॉगमध्ये त्यांनी केजरीवालांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत़ ‘आप’ चे चिंतन शाजिया इल्मी आणि जी़आऱ गोपीनाथ यांनी पक्षावर केलेल्या आरोपांवर काहीही बोलण्यास आम आदमी पार्टीने नकार दिला़ इल्मी व गोपीनाथ यांचे राजीनामे दुर्दैवी आहेत़ त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर पक्ष चिंतन करेल, असे आप नेते योगेन्द्र यादव म्हणाले़ गोपीनाथ यांनी सन २००३ मध्ये ‘एअर डेक्कन’ या स्वस्त विमान कंपनीची स्थापना केली होती़ कालांतराने विजय माल्या यांनी ही कंपनी अधिग्रहित केली होती व तिचे ‘किंगफिशर रेड’ असे नामकरण केले होते़ आता ही कंपनी बंद झाली आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)