रथयात्रेत चेंगराचेंगरी; २ ठार
By Admin | Updated: July 19, 2015 02:34 IST2015-07-19T02:34:46+5:302015-07-19T02:34:46+5:30
श्री जगन्नाथांच्या रथयात्रेत शनिवारी घडलेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला ठार, तर अन्य १५ जण जखमी झाले. श्री जगन्नाथांचा रथ गुंडिचा मंदिराकडे भाविक ओढून नेत असताना

रथयात्रेत चेंगराचेंगरी; २ ठार
पुरी (ओडिशा) : श्री जगन्नाथांच्या रथयात्रेत शनिवारी घडलेल्या चेंगराचेंगरीत दोन महिला ठार, तर अन्य १५ जण जखमी झाले. श्री जगन्नाथांचा रथ गुंडिचा मंदिराकडे भाविक ओढून नेत असताना ही शोकांतिका घडली.
बलगंदी चौकात एक महिला ठार झाली, तर दुसरी ६० वर्षांची महिला मरीचकोट चाकनजीक झालेल्या चेंगराचेंगरीत ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांना कटक येथील एससीबी मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात हलविण्यात आले आहे. प्रचंड उकाडा आणि श्वास गुदमरल्याने ६० जण भोवळ येऊन पडले. त्यांना पुरीतील विविध इस्पितळांत दाखल करण्यात आले आहे.
रथ ओढण्यासाठी भाविकांचा लोंढा रथाकडे धावला. रथ ओढताना विजयलक्ष्मी मोहंती (६५) खाली पडल्या. मागावून येणाऱ्या भाविकांच्या पायाखाली त्या तुडविल्या गेल्याने ठार झाल्या. दुसऱ्या मृत महिलेची ओळख मात्र पटली नाही. नऊ दिवसांच्या रथयात्रेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. लष्कराची फलटण, दहशतवादी विरोधी पथक, जलद कृती दल, एनएसजी कमांडोज महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले असून, किनारपट्टीवरही बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे.
श्री जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवीच्या नवीन मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक पुरीत जमले आहेत. शनिवारी नबकलेबर यात्रा परंपरेनुसार मोठ्या उत्साहाने काढण्यात आली. नबकलेबरमुळे ४५ दिवस या पावन मूर्ती आतच होत्या. पहिल्याच दिवशी श्री जगन्नाथ यांच्या नव्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या उत्साहाने जमले आहेत. (वृत्तसंस्था)