तूर्त काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री सुरक्षित
By Admin | Updated: May 19, 2014 02:48 IST2014-05-19T02:48:34+5:302014-05-19T02:48:34+5:30
निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. त्याचा दोष नेतृत्वाचा देता येणार नाही.
तूर्त काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री सुरक्षित
यदु जोशी / गजानन जानभोर , नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारली असली तरी काँग्रेस कार्य समितीच्या सोमवारी होणार्या बैठकीत या दोन नेत्यांच्या नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त करीत सामूहिक जबाबदारीच स्वीकारली जाणार आहे. परिणामी तूर्तास काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्याची खुर्ची सुरक्षित राहील, असे चित्र आहे. काँग्रेस पक्षासाठी गांधी-नेहरू घराण्याने मोठा त्याग केला आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. त्याचा दोष नेतृत्वाचा देता येणार नाही. आम्ही कुठे चुकलो, भविष्यात कुठल्या सुधारणा करायला हव्यात याची कारणमीमांसा उद्याच्या बैठकीत केली जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. काँग़्रेसच्या पराभवानंतर आता पक्षाने गांधी घराण्याच्या पलीकडे जाऊन विचार करायला हवा काय, हा मुद्दा सध्या चर्चिला जात आहे. व्होरा यांनी तो पूर्णत: फेटाळला. काँग्रेस पक्षसंघटनेत लवकरच काही बदल केले जातील. त्यात तरुण नेत्यांना संधी दिली जाईल, असे त्यांनी सूचित केले.