स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

By Admin | Updated: February 19, 2016 00:40 IST2016-02-19T00:40:50+5:302016-02-19T00:40:50+5:30

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे

Smart grams should be perfect with facilities. Babanrao Shinde - wording: D.S. Gaekwad | स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

स्मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

मार्ट ग्राम सुविधांनी परिपूर्ण असावे
आ. बबनराव शिंदे - शब्दांकन : डी.एस. गायकवाड

स्मार्ट ग्राम निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे सक्षमीकरण, विविध कामांची अंमलबजावणी, पर्यावरण संरक्षण, वनीकरण, स्वच्छता, जलसंधारण, आरोग्य या मूलभूत सुविधांनीयुक्त व आरोग्याने परिपूर्ण अशी गावे निर्माण झाली पाहिजेत. यापैकी प्रत्येक मुद्यावर आमदार शिंदे यांनी दिलखुलास विचार मांडले.
स्वच्छता :
स्वच्छता हा आरोग्याचा पाया आहे, या दृष्टीने प्रत्येक गाव हागणदारीमुक्त झाले पाहिजे. प्रत्येक कुटुंबात शौचालय असले पाहिजे व त्याचा वापर झाला पाहिजे. जेथे जागेचा प्रश्न असेल तेथे पाच-सहा कुटुंबात एक शौचालय बांधले पाहिजे. ज्या गावांना निर्मलग्राम पुरस्कार मिळालेत, हागणदारीमुक्त गावाची घोषणा झाली तेथे आजही 30 टक्के नागरिक उघड्यावर शौचालयास जातात ही स्थिती बदलली पाहिजे.
प्रत्येकाने आपले अंगण व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. जागा असेल तेथे झाडे लावावीत.
ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अस्तित्वात आहेत; परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांची कमतरता आहे. डॉक्टरांच्या नेमणुका केल्या पाहिजेत. प्रत्येक आरोग्य केंद्रात रक्त, लघवी व इतर तपासण्यासाठी लॅब असली पाहिजे. पुरेसे कर्मचारी असावेत. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण स्त्रियांच्या बाळंतपणासाठी सुसज्ज अशी सोय असावी व अद्ययावत ऑपरेशन थिएटर असावे.
ग्रामपंचायत प्रशासन पारदर्शी व गतिमान असले पाहिजे, तलाठी, ग्रामसेवक व कृषी अधिकारी एकच व्यक्ती असली पाहिजे. यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही. ग्राम पातळीवरील कर्मचार्‍यांनी 11 ते 5 कार्यालयात थांबले पाहिजे. ग्रामसेवकास स्थानिक पातळीवरील सर्व दाखले देण्याचे अधिकार असले पाहिजेत. सामान्य शेतकर्‍यास त्रास न देता खरेदीनंतर वेळेत नोंदी लावल्या पाहिजेत.
सतत पडणारा दुष्काळ व पाणी टंचाई हा ग्रामीण भागातील गंभीर प्रश्न बनला आहे. यावर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीत जिरवला पाहिजे. ओढे-नाले यांचे खोलीकरण करून पाणी अडवले पाहिजे. गावात पाझर तलाव, नाला बंडिंगची कामे मोठय़ा प्रमाणात झाली पाहिजेत. शेतीसाठी आता प्रवाही पद्धतीने पाणी देणे परवडणारे नाही. त्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे शेती ही लोकचळवळ बनली पाहिजे, संपूर्ण गाव ठिबक सिंचन केलेले असावे.
लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी आर.ओ. प्लांट उभारून माफक किमतीत ते नागरिकांना दिले तर आरोग्याचा प्रश्न राहणार नाही.
गावात व परिसरात मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड केली पाहिजे. धुरमुक्त गाव संकल्पना राबवून चुलीचा वापर न करता गॅसचा वापर केला पाहिजे. रोजगार हमीच्या कामाद्वारे वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक शाळेतील गुणवत्ता वाढली पाहिजे. अंगणवाडी, प्राथमिक शिक्षणाबरोबरच प्रत्येक गावात उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय असली पाहिजे. विशेषकरून सायन्स शाखेची गरज आहे. शासनाने शिक्षण कर माफ केला पाहिजे, त्यामुळे पीकपाण्याची नोंद अचूक होईल. खोटी माहिती कोणी देणार नाही व त्यामुळे शासनास विविध योजनांचे अचूक नियोजन करता येईल.
शासनाच्या विविध योजना सुलभ होण्यासाठी व जनतेला त्रास होऊ नये म्हणून आलेल्या प्रत्येक अर्जाची संबंधित कार्यालयात नोंद असली पाहिजे. आलेल्या अर्जांचा निपटारा वेळेत केला पाहिजे.
संजय गांधी निराधार योजना, र्शावणबाळ योजना, बी.पी.एल. यासारख्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी एनजीओचा वापर केला पाहिजे.
‘स्मार्ट ग्राम’ कल्पनेबाबत विस्ताराने बोलताना आमदार बबनराव शिंदे म्हणाले की, गावपातळीवर जमिनीच्या बांधावरून व गावातील रस्त्यावरून सतत भांडणे होत असतात, त्यामुळे गावची शांतता व सलोखा धोक्यात येत असते. यासाठी शेतातील बांध व रस्ते यांची मोजणी करून खुणा करून दिल्यास भांडणे होणार नाहीत.
वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन गावठाण वाढवून घेतले पाहिजे व जेथे अतिक्रमण करून घरे बांधली आहेत ती नियमित केली पाहिजेत, जेणेकरून गरीब माणसे विस्थापित होणार नाहीत.
गावपातळीवर या सर्व गोष्टी करत असताना फक्त शासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून व लोकांना विश्वासात घेऊन पारदर्शी कारभार केला तर गावे स्मार्ट होतील.

Web Title: Smart grams should be perfect with facilities. Babanrao Shinde - wording: D.S. Gaekwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.