गरिबी हटावसाठी कौशल्यवृद्धी मिशन
By Admin | Updated: July 16, 2015 05:44 IST2015-07-16T05:29:19+5:302015-07-16T05:44:04+5:30
अनेक विकसित देशांकडे संपत्ती आहे, मात्र मानव संसाधनांचा अभाव आहे. देशातील मनुष्यबळाला योग्यरीत्या प्रशिक्षण दिले गेल्यास नजीकच्या भविष्यात केवळ भारतच जगाची

गरिबी हटावसाठी कौशल्यवृद्धी मिशन
नवी दिल्ली : अनेक विकसित देशांकडे संपत्ती आहे, मात्र मानव संसाधनांचा अभाव आहे. देशातील मनुष्यबळाला योग्यरीत्या प्रशिक्षण दिले गेल्यास नजीकच्या भविष्यात केवळ भारतच जगाची कुशल मनुष्यबळाची गरज भागवू शकेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी ‘स्किल इंडिया मिशन’चे उद्घाटन करताना बुधवारी व्यक्त केला. सन २०२२पर्यंत १५ हजार कोटी रुपये खर्च करून देशातील ४० कोटी व्यक्तींना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्याचे या मिशनचे उद्दिष्ट आहे.
आपण दारिद्र्याविरुद्ध युद्ध छेडले असून ते जिंकायचे आहे, असे आवाहन करून मोदी म्हणाले की, भारतातील लोकांकडे काम करण्याची प्रचंड क्षमता आहे व अनेक शतकांपासून त्यासाठी भारत ओळखला जातो. मात्र आपण कौशल्य हरवून बसलो आहोत. आपल्याला ते पुन्हा मिळवावे लागेल व त्यासाठी देशातील प्रशिक्षण संस्था सशक्त आणि गतिशील बनाव्या लागतील.
पंतप्रधान असेही म्हणाले की, चीन जगाची ‘मॅन्युफॅक्चरिंग फॅक्ट्री’ म्हणून ओळखला जाणार असेल तर भारताला जगाची कुशल मनुष्यबळाची राजधानी बनण्याचे उद्दिष्ट डोळ््यापुढे ठेवावे लागेल. ते म्हणाले की, योग्य आणि गतिशील कौशल्य प्रशिक्षण देण्याची यंत्रणा उभी केल्यास भारत जगाला चार ते पाच कोटी एवढे कुशल मनुष्यबळ पुरवू शकतो.
सरकारने त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जग आणि तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. येत्या १० वर्षांत योजना आखण्यासाठी आपल्याला भविष्याचा दृष्टिकोन अवलंबावा लागेल. त्यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान तज्ज्ञांदरम्यान नियमित संवाद घडवून आणण्याची गरज
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राष्ट्रीय कौशल्य मिशनचा प्रारंभ करताना ते म्हणाले की, देशात असंघटित क्षेत्रात ४४ कोटी अप्रशिक्षित लोक काम करीत असून त्यातील ४७ टक्के कृषी क्षेत्रात तर ५३ टक्के लोक अन्य क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय दरवर्षी १० लाख नवे अप्रशिक्षित कामगार देशाच्या श्रमशक्तीशी जोडले जात आहे. अशा लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी राष्ट्रीय कौशल्य मिशनचा प्रारंभ करण्यात आला आहे. कौशल्य विद्यापीठ स्थापन करून युवकांना रोजगारपूरक प्रशिक्षण देऊन उद्योग आणि स्वयंरोजगारायोग्य बनविले जाईल. भारतात कुशल कामगारांची संख्या केवळ ३.५ टक्के आहे तर दक्षिण कोरियात ही संख्या ९६ आणि जर्मनीत ७४ टक्के आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
गेल्या शतकात भारतीय आयआयटींनी जागतिक पातळीवर नाव कमावले आहे. या शतकात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी(आयटीआय) नाव कमावण्याची वेळ आली आहे.
आम्ही दारिद्र्याविरुद्ध व्यूहरचनात्मक युद्ध पुकारले आहे. आपल्याला ही लढाई जिंकावीच लागेल. मी गरिबांची फौज निर्माण करेन. गरीब असलेला प्रत्येक जवान आपापल्या शक्तिनिशी ही लढाई जिंकणार आहे.
चीनची जागतिक उत्पादक(मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी) अशी ओळख असेल तर भारत हा जागतिक मानव संसाधन राजधानी बनू शकतो.
आपल्या प्रशिक्षण संस्था सशक्त बनाव्या. तंत्रज्ञान कशा पद्धतीने बदलत आहे ते बघा.
आधी नोकरी की आधी अनुभव या आवर्तातून रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. नोकरीच मिळाली नाही तर अनुभव कुठून मिळायला? तरीही अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, ही स्थिती कोंबडी आधी की अंडे आधी अशी आहे.
कौशल्यावर प्रमाणपत्राची मोहोर उमटवून त्याला प्रतिष्ठा द्यायची आहे. मग गरजा व कौशल्य ही दोन टोके जोडायची आहेत.
केवळ नोकरीचा विचार न करता लोकसंख्येचे मनुष्यबळात रूपांतर करताना कौशल्य आणि उद्योजकता यांचीही सांगड घालत उद्यमशीलतेला प्रोत्साहन देणार.
भारतात येत्या दशकभरात साडेचार ते पाच कोेटी लोक उपलब्ध संधींचा विचार करता ‘अतिरिक्त’ ठरणार आहेत. त्यावर उपाय म्हणून हे मिशन गरजेचे आहे.
गरजा आणि कौशल्यांचे प्रकार यांचा सविस्तर आढावा घेण्यातून कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्था अद्ययावत ठेवणे शक्य आहे.
पर्यटन हे अफाट क्षमता असलेले क्षेत्र आहे. पण आग्रासारख्या ठिकाणी परदेशी पर्यटकांशी संवादात उपयुक्त ठरेल अशी भाषा शिक्षणाची सर्वाधिक केंद्रे का नाहीत? ती निर्माण केली पाहिजेत. अशा ठिकाणी सर्वोत्तम गाइड कोण, याच्या स्पर्धा लावून बक्षीसे दिली पाहिजेत.
औपचारिक मुख्य प्रवाहात न शिकताही कौशल्ये मिळविणाऱ्यांना त्यांच्या क्षमतेला मूल्यवृद्धीचे कोंदण देणे शक्य आहे. प्लंबिंग करणारा माणूस त्या जोडीला योग शिक्षक होतो, हे त्याचेच तर उदाहरण...
पूर्वी भारतातील अनेक कौशल्ये ही आपली ताकद आणि मक्तेदारी होती. तेच बलस्थानही होते. ते गतवैभव परत मिळविण्याचा आपला संकल्प आहे.
माणसाच्या आयुष्यात गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत निदान ९२६ गोष्टी अपरिहार्यपणे आवश्यकतेच्या रूपात येतात. म्हणजेच निदान ९२६ कौशल्ये आपण विकसित केली पाहिजेत. त्या कौशल्यांना मरण नाही.
प्रशिक्षण संस्थांना काळाच्या बरोबरीने चालावे लागेल. तरच घेतलेल्या शिक्षणाची उपयुक्तता नोकरी- व्यवसाय वा स्वंयरोजगार याच्या रूपात सिद्ध होईल. त्यासाठी अभ्यासक्रमातही बदल करत रहावे लागेल. त्यासाठी पुढील दहा वर्षातील संभाव्य तंत्रज्ञानाचा व त्यात होणाऱ्या बदलांचा अंदाज घ्यावा लागेल.
देशाला नवी ऊर्जा
‘स्कील इंडिया’ हा पोट भरण्यासाठी सुरू केलेला कार्यक्रम नसून गरीब कुटुंबांमध्ये आत्मविश्वास भरण्याचा आणि देशाला नवी ऊर्जा मिळवून देण्याचा त्यामागे उद्देश आहे. या मिशनच्या माध्यमातून आम्हाला जनतेची स्वप्नपूर्तता करायची आहे.
हे आम्हाला नियोजनबद्धरीत्या करायचे असून त्यासाठी राज्यांना सोबत घ्यायचे आहे. तरुणांच्या रोजगाराला पोषक अशी संरचना आणि यंत्रणा निर्माण केली जाईल, जेणेकरून त्यांना रोजगार शोधता येईल.
कौशल्य हे केवळ खिशात पैसे भरण्यासाठी नव्हे तर आत्मविश्वासाची भावना निर्माण करून जीवनाला नवी शक्ती प्रदान करण्यासाठी आहे. या देशातील युवकांना दारिद्र्यात जीवन जगायचे नाही. त्यांना आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा हवी आहे.