‘शरीफ’ इमेज ‘खमकी’ होण्याची चिन्हे
By Admin | Updated: May 26, 2014 03:10 IST2014-05-26T03:10:23+5:302014-05-26T03:10:23+5:30
डिप्लोमॅटिक संबंधाची झुंज लावून देण्यात माध्यमांना रस असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत-पाक संबंधाना या शपथविधीनंतर चांगले दिवस आले तर ते पाकिस्तानी जनतेलाही हवेच

‘शरीफ’ इमेज ‘खमकी’ होण्याची चिन्हे
मेघना ढोके, नाशिक - डिप्लोमॅटिक संबंधाची झुंज लावून देण्यात माध्यमांना रस असला तरी प्रत्यक्षात मात्र भारत-पाक संबंधाना या शपथविधीनंतर चांगले दिवस आले तर ते पाकिस्तानी जनतेलाही हवेच आहे, मोदींच्या नेतृत्वाविषयीची उत्सुकता सीमेपारही वाढताना दिसते आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी तमाम विरोध झुगारून घेतलेला भारतभेटीचा निर्णय त्यांची देशांतर्गत प्रतिमा तर उजळवेलच पण भारत-पाक व्यापारवृद्धीसाठीही या सकारात्मक कृतीचा उपयोग होईल अशी आशा पाकिस्तानी जनतेला वाटते आहे. भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडिया ज्याप्रमाणे डिप्लोमॅटिक वॉर कोण जिंकले आणि मोदींनी पाकसह नवाज शरीफ यांची कशी कोंडी केली याची समीकरणे मांडण्यात मशगूल आहे तशीच स्थिती पाकिस्तानी मीडियातही आहे. नवाज शरीफ यांनी भारताची ही ‘दावत’ स्वीकारून हिंदुत्ववादी मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणे बरे नव्हे असे काही पाकिस्तानी माध्यमं वारंवार म्हणत आहेत. त्यात पाकिस्तान आर्मीला ‘जवळची’ असलेली काही माध्यमं पाक सैन्याचा विरोध वारंवार अधोरेखित करत पाकिस्तानी अस्मितेची दळणे दळत आहेत. प्रत्यक्षात पाकिस्तानी जनता मात्र नवाज शरीफ यांच्या या खंबीर निर्णयाने आणि खमक्या कृतीने खूश आहे. पाकिस्तानातले ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार अमर गुरडो सांगतात, ‘भारताशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यापलीकडे पाकिस्तानकडे आजच्या घडीला तरी दुसरा काही पर्यायच नाही. पाकिस्तान स्वत:च दहशतवादाच्या आगीत होरपळतो आहे, विकास आणि महागाईच्या प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. त्यात अफगणिस्तानला कण्ट्रोल करत दहशतवाद्यांना वेसण घालण्याची पाकिस्तानची जुनी स्ट्रॅटेजीही आता सैन्याच्या हातात उरलेली नाही. देशांतर्गत प्रश्नांतून डोके वर काढणे शक्य नसताना भारताशी असलेल्या संबंधात अकारण तणाव शरीफ यांना परवडणारा नाही त्यामुळेच सैन्याचा विरोध न जुमानता पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतभेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. वाजपेयींना पाक भेटीचे निमंत्रण देऊन शरीफ यांनी अशीच ‘पहल’ पूर्वीही एकदा केली होती. पण त्या वेळी मुशर्रफ यांनी सैन्याचे बंड करून शरीफ यांनाच पदच्युत केले. या वेळेस परिस्थिती वेगळी आहे, लोकनियुक्त पाक सरकार पूर्वीपेक्षा जास्त खमके आहे आणि शरीफ ज्या पंजाब प्रांताचे आहेत त्या प्रांताचे भारत-पाक मैत्रीला मोठे पाठबळ मिळते आहे.’ या कृतीचा पाकिस्तानात काय ‘मेसेज’ जाईल याचा विचार करूनच नवाज शरीफ भारतभेटीवर निघत आहेत. त्यांना तातडीने भारत-पाक व्यापार वृद्धीत रस आहे. ते स्वत: व्यापारी वृत्तीचे आहेत त्यामुळे व्यापार वाढ आणि अर्थव्यवस्थेला गती ही त्यांच्यापुढची तातडीची उद्दिष्टे आहेत. त्यामुळेच ‘गुजराती’ मोदींच्या व्यापारी दृष्टिकोनाकडे तेही अधिक सकारात्मकतेने पाहत असावेत. भारत-पाक व्यापार वाघा-अटारी सीमेवरून सुरू झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा पाकिस्तानावर जबरदस्त पकड असलेल्या पंजाब प्रांताला होऊ शकतो. म्हणून पंजाब प्रांतात या भेटीविषयी उत्साह अधिक आहे अशी उकल करतानाच लाहोरच्या जंग वृत्तपत्रात कार्यरत वरिष्ठ पत्रकार शहजादा इरफान अहमद सांगतात, ‘लोकांना ‘बिझनेस’ हवा आहे, आर्थिक विकास हवा आहे आणि त्याचमुळे भारत-पाक व्यापारी संबंध अधिक सुकर व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे.