दुष्काळाला शरद पवारच जबाबदार !

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:41+5:302015-09-07T23:27:41+5:30

Sharad Pawar responsible for the drought! | दुष्काळाला शरद पवारच जबाबदार !

दुष्काळाला शरद पवारच जबाबदार !

>बाळासाहेब विखे : विकासाचा खेळखंडोबा केल्याचा आरोप

अहमदनगर : राज्यात पाण्याचे निर्माण झालेले दुर्भिक्ष्य व सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली आहे. राज्यात पाणीप्रश्नावरुन तेच भांडणे लावण्याचे काम करतात. दुष्काळावर मोर्चा काढणार्‍या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी लोणी येथे पत्रपरिषदेत बोलताना विखे यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि नंतर थेट त्यांच्यावर संधान साधले. विखे म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषी मंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. मात्र आज त्यांच्यावरच दुष्काळप्रश्नी मोर्चा काढण्याची वेळ येते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पवार उठसूट दुसर्‍यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. त्यांना कळत होते तर त्यांनी आजवर काय केले, असा सवाल विखेंनी केला.
मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहील, याचे नियोजन पवारांनी खुबीने केले. नाशिक, नगर, मराठवाड्यात भांडणे लावण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न पेटत ठेवला. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८० टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे, असे विखे म्हणाले.
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. उद्योगांतून जास्त कर मिळतो, शेतीतून कमी मिळतो, असे लंगडे समर्थन त्यासाठी केले जाते. न्याय देणे हे त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात. पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. मात्र त्यांना ही तथाकथित टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही विखे यांनी मारली. (प्रतिनिधी)
---------
बारामतीकर बहुरुपी
उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरुन काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरुन पश्चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरुपी असल्याचे सिद्ध होते, असे विखे म्हणाले.
------------
(मराठवाड्यासाठी)
आठमाही कालवे धोरण
शंकरराव चव्हाण यांनी कालवे बारमाहीचे आठमाही करावेत, असे धोरण जाहीर केले. कुकडीपासून त्याची सुरुवात झाली. पवारांनीही त्यास पाठिंबा दिला. पुढे त्याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. केंद्रात कृषी मंत्री असताना कृत्रिम पावसाच्या धोरणास त्यांनी विरोध केला होता. दुष्काळी भागातील जनता सतत आपल्या दारात आली पाहिजे, हेच राजकारण त्यामागे होते. सध्याच्या राज्य सरकारने कृत्रिम पावसाचे धाडस केले. पवारांनी मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रातून या प्रयोगासाठी पैैसे आणण्यासाठी वजन खर्ची घालावे, असा सल्लाही विखेंनी दिला.
---------

Web Title: Sharad Pawar responsible for the drought!