शाहरूख, आमीरच्या पोलीस संरक्षणात घट

By Admin | Updated: January 8, 2016 18:37 IST2016-01-08T03:54:45+5:302016-01-08T18:37:10+5:30

शाहरूख खान आणि आमीर खान या सुपरस्टार्सना दिलेल्या पोलीस संरक्षणात कपात करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तींना देण्यात आलेल्या संरक्षणाचा आढावा मुंबई पोलिसांनी नुकताच घेतला

Shah Rukh, Aamir's police protection deficit | शाहरूख, आमीरच्या पोलीस संरक्षणात घट

शाहरूख, आमीरच्या पोलीस संरक्षणात घट

डिप्पी वांकाणी,  मुंबई
शाहरूख खान आणि आमीर खान या सुपरस्टार्सना दिलेल्या पोलीस संरक्षणात कपात करण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम व्यक्तींना देण्यात आलेल्या संरक्षणाचा आढावा मुंबई पोलिसांनी नुकताच घेतला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
दिग्दर्शक राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि मोरानी बंधूंना असलेले संरक्षण पूर्णपणे काढून घेण्यात आले असून, अभिनेता अक्षय कुमार, महेश मांजरेकर, महेश आणि मुकेश भट्ट आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांकडून बॉलिवूडमधील तीन डझनपेक्षा जास्त लोकांना संरक्षण दिले गेले होते. आता ती संख्या फक्त १५ आहे. सध्या आम्ही व्यावसायिक, राजकीय नेते आणि प्रसिद्ध व्यक्तींसह ३११ जणांना कोणत्याही वर्गवारीत नसलेली (अनकॅटागराईजड्) सुरक्षा देत आहोत.


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूडमधील अनेकांना गुन्हेगारी जगातून (अंडरवर्ल्ड) धमक्या आल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यात आले होते. आता त्या धमकीची तीव्रता कमी झाल्यामुळे आम्ही सुरक्षा एकतर काढून घेतली आहे किंवा ती काही प्रकरणात कमी केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.गँगस्टर रवी पुजारीकडून शाहरूख खानला धमकी मिळाली आहे तर आमिर खानला अबू सालेम टोळीशी संबंधिताकडून. याआधी आमचे संरक्षण कलाकारांना ते जेथे कुठे जातील तेथे अधिकारी व कॉन्स्टेबलचे असायचे. शिवाय आमचे वाहन त्यांच्या वाहनांसोबतच असायचे. आता आम्ही वाहन देणार नाही, असेही या सूत्रांनी म्हटले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवी पुजारीने अनेक निर्मात्यांना दूरध्वनीवर पैसै मागितले होते. त्यात विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी व मोरानी बंधुंचा समावेश आहे. चोप्रा आणि हिराणी यांनी ‘थ्री इडीएटस्’ आणि ‘पीके’ एकत्र येऊन बनविला होता. मोरानी बंधुंनी ‘चेन्नई एक्स्प्रेस’ आणि ‘हॅप्पी न्यू ईयर’ हे लागोपाठे हिट चित्रपट दिले. आम्ही नुकताच धमक्यांचा आढावा घेतला. त्यात आता त्यांना गुन्हेगारी जगाकडून धमक्या नाहीत असे आढळले त्यामुळे आम्ही त्यांचे संरक्षण पूर्णपणे काढून घेतले, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारला त्याच्या ‘ओह माय गॉड’ या चित्रपटासाठी तर महेश भट्ट यांना इंडियन मुजाहिदीनकडून (आयएम) तर मुकेश भट्ट यांना त्यांच्या ‘आशिकी २’ चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर चांगला व्यवसाय केल्याबद्दल अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या आहेत. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि निखिल अडवाणी यांना रवी पुजारीकडून धमक्या आल्यामुळे सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. आमची भूमिका नेहमीच अशी आहे की गरज असेल तेव्हाच संरक्षण पुरवायचे. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना केवळ देखाव्यासाठी संरक्षण हवे असते. परंतु आम्ही परिस्थितीचा आढावा नियमितपणे घेत असतोच. संरक्षणामुळे पोलिसांचे तास वाया जातात व सरकारच्या तिजोरीवर खर्चाचा बोजा पडतो म्हणून आम्ही मनुष्यबळ काढून घेत असतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
शाहरूख खान आणि आमीर खान
संरक्षण पुरते काढले
विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिराणी आणि मोरानी बंधू
संरक्षण कायम
अक्षय कुमार, महेश मांजरेकर, भट्ट बंधू, निखिल अडवाणी

Web Title: Shah Rukh, Aamir's police protection deficit