उद्योजिकांसाठी मनपाने व्यापार संकुल उभारावे

By Admin | Updated: December 28, 2014 23:40 IST2014-12-28T23:40:21+5:302014-12-28T23:40:21+5:30

फोटो आहे...

Setting up business packages for entrepreneurs | उद्योजिकांसाठी मनपाने व्यापार संकुल उभारावे

उद्योजिकांसाठी मनपाने व्यापार संकुल उभारावे

टो आहे...
मेळाव्याचे उद्घाटन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
नागपूर : महिला उद्योजिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, लोकांना कमी किमतीत वस्तू मिळाव्यात, यासाठी महापालिकेने व्यापार संकुल उभारल्यास राज्य सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले.
मनपाचा समाज कल्याण विभाग, महिला व बाल कल्याण समितीतर्फे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याच्या माध्यमातून महिला बचत गट व उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. चीनमध्ये सर्व वस्तू एकत्रित मिळण्यासाठी मॉलची संस्कृती आहे. त्या धर्तीवर मनपाने व्यापार संकुल निर्माण करून उद्योजिकांना कायमस्वरूपी जागा उपलब्ध करावी, असेही ते म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री पूनम धिल्लन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महापौर प्रवीण दटके अध्यक्षस्थानी होते. आमदार कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, अनिल सोले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर,आयुक्त श्याम वर्धने, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह आदी उपस्थित होते.
उद्योजक महिलांत आत्मविश्वास निर्माण व्हावा, तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याची त्यांना संधी मिळावी, या उद्देशाने दरवर्षी मेळाव्याचे आयोजन केले जाते. उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर उत्तम दर्जा, पॅकेजिंग व वेळेत वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या त्रिसूत्रीचा महिला बचत गटांनी अवंलब करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. यापुढे कॉटन मार्केट व धान्य बाजारात कामगारांना ओझे वाहून न्यावे लागणार नाही. यासाठी ई-कार व ई-रिक्षाचा वापर करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. येणारा काळ कौशल्य व गुणवत्तेचा असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिनयासोबत व्हॅनिटी व्हॅनचा यशस्वी उद्योग केल्याचे पूनम धिल्लन यांनी सांगितले. नारी शक्तीत विश्वास निर्माण होण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरेल, असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी जिज्ञासा कुबडे, रोशनी शिर्के, शीतल किंमतकर, डॉ. आरती सिंह, सुनीता क्षीरसागर, छबूताई मडावी, वंदना शर्मा, मीना गोडबोले, नालंदा गणवीर व मयुरी नंदनवार या महिलांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी जिचकार यांनी तर आभार माहिती अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. मेळाव्यात २५० स्टॉल असून ४ जानेवारीपर्यंत हा मेळावा चालणार आहे.

Web Title: Setting up business packages for entrepreneurs