महागाईवर मोदींना संघाने दिला तोडगा
By Admin | Updated: June 4, 2014 11:06 IST2014-06-04T11:06:25+5:302014-06-04T11:06:41+5:30
महागाईवर मात करण्यासाठी चीनसोबतचा व्यापार कमी करणे व परकीय गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढण्याचा सल्ला संघाने नरेंद्र मोदी सरकारला दिला आहे.

महागाईवर मोदींना संघाने दिला तोडगा
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ४ - महागाईवर मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आर्थिक शाखा स्वदेशी जागरण मंचाने मोदी सरकारला अजेंडा दिला आहे. परकीय गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढणे, तसेच शिक्षण क्षेत्रात नवीन सुरुवात असे महत्त्वपूर्ण उपाय स्वदेशी जागरण मंचाने मोदी सरकारला सुचवले आहे.
स्वदेशी जागरण मंचाने वाढते दर व महागाईवर लगाम लावण्यासाठी मोदी सरकारसमोर अनोखे उपाय मांडले आहे. मंचाचे संयोजक अरुण ओझा म्हणाले, प्रत्येक वस्तूवर एमआरपीसोबतच उत्पादन खर्चही लिहायला हवे. त्यामुळे ग्राहकांना दुकानदार किती नफा घेतो याचा अंदाज येईल. सरकारला रिटेलर व उत्पादक यांच्या नफ्याचे प्रमाण ठरवणे गरजेचे आहे. याचा फायदा ग्राहकांनाच होईल.
चीनी वस्तूंचा भारतातील शिरकाव यावरही लगाम लावण्याची गरज मंचाने व्यक्त केली आहे. टेलिकॉम, उर्जा यासह अन्य सर्व सेक्टरमधील चीनसोबतचा व्यवसाह बंद करावा. स्वस्त चीनी मालामुळे लघू व मध्यम उद्योगांना मोठा फटका बसत आहे. चीनसोबतचा व्यवसाय बंद केल्यास देशातील उद्योगांना वाव मिळेल व त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण होतील असे मंचाचे म्हणणे आहे.
परकीय गुंतवणूकीसाठी (एफडीआय) सरकारने सावध भूमिका घेऊन एफडीआयसंदर्भात श्वेतपत्रिका सादर करावी. तसेच रक्षा आणि अन्य महत्त्वाच्या क्षेत्रात एफडीआयसाठी घाई गडबडीत निर्णय घेऊ नये. याऐवजी नेमक्या कोणत्या क्षेत्रात एफडीआयमध्ये वाढ करावी याचा सखोल अभ्यास करुनच पुढील निर्णय घ्यावा असे मंचाने सरकारसमोर सादर केलेल्या अंजेड्यात म्हटले आहे.